‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी’ या पुस्तकावर संभाजी ब्रिगेडचा आक्षेप
खोटा इतिहास मांडून शिवरायांचे ‘रामदासीकरणा’चा घाट
पुणे |महाईन्यूज|प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजाच्या गुरुबद्दल सतत चुकीचे व बदनामीकारक मजकूर छापून लहान मुलांच्या बालमनावर खोटा इतिहास बिंबवण्याचा काम काही लेखक, प्रकाशन संस्था जाणून बुजून करु लागल्या आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी…’ ह्या नविन पुस्तकांतून शिवरायांचे रामदानीकरण करण्याचा घाट घातला आहे. दरम्यान, सदरील लेखक व प्रकाशन संस्थेवर कारवाई करुन पुस्तकांवर तत्काळ बंदी घालण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे.
दरम्यान, शिंदे यांनी आपल्या फेसबूकवरुन म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुबद्दल सतत वाद निर्माण केला जात आहे. खोटे आणि संदर्भहीन पुस्तक बाजारात उपलब्ध केले आहे. काही गोष्टी, अभ्यासक्रम किंवा कथा कादंबऱ्यांच्या माध्यमातून खोटा इतिहास समाजात जाणूनबुजून पसरवला जात आहे. कधी-कधी राजकारण्यांची शिवाजी महाराजांसोबत तुलना करून मोठेपणा मिळवून घेतला जात आहे. हे सर्व निषेधार्ह असून हा सगळा प्रकार महाराजांचे रामदासीकरण करण्याचा घाट आहे.
‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी…’ ह्या नविन पुस्तकामध्ये छत्रपती आणि रामदास स्वामींच्या कथा-गोष्टी सांगितल्या आहेत. त्यात शिवाजी महाराज वैफल्यग्रस्त अवस्थेत होते. रामदासांनी त्यांना मार्गदर्शन केल्यामुळे महाराज स्वराज्य निर्माण करू शकले. अन्यथा त्यांनी स्वराज्याचा त्याग केला असता. (उदा. श्री श्री श्री रविशंकर यांची गोष्टीचे पुस्तक अथवा व्हिडिओ) अशा खोट्या आणि चुकीच्या गोष्टी सांगून लहान मुलांवर सुद्धा खोटा इतिहास बिंबनवण्याचे काम आज सुरू आहे.
या सगळ्या पुस्तकांवर राज्य सरकारने तत्काळ बंदी घालावी, लेखक, सर्व प्रकाशन संस्थेला नोटिसा देण्यात याव्यात. कारण, पुण्यासह महाराष्ट्रात ‘काही प्रकाशन संस्था’ ज्या फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संकुचित करून तो चुकीचा मांडत आहेत. बदनामीकारक आणि खोट्या इतिहासाची पेरणी या छोट्या-मोठ्या पुस्तकाच्या माध्यमातून सुरु आहे. या प्रकाशकाला व लेखकावर कारवाई करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेड आता करणार आहे. तसेच आम्ही किती दिवस छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी सहन करणार आणि खोटा इतिहास गपचूप बसून मान्य करणार असाही प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला आहे.