खडकवासला धरण 90 टक्क्यांपेक्षा जास्त भरल्याने मुठा नदीपात्रात विसर्ग सुरु; पुणेकरांवरील पाणी कपातीचे संकट टळले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/maxresdefault-2.jpg)
पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे खडकवासला धरण भरलंय. पावसाची संततधार सुरुच असल्यानं आज धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला असून पाण्याचा विसर्गाला सुरुवात झाली आहे. “खडकवासला धरण 90 टक्क्यांपेक्षा जास्त भरल्याने मुठा नदीपात्रात विसर्ग सुरु करण्यात आला असून विसर्गाचा वेग 428 क्युसेक इतका आहे. विसर्ग जास्त नसला तरी पुणे महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवली आहे,” अशी माहिती महपौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
पुणेकरांना अजूनही पाणी संकटला सामोर जाव लागत आहे. याच पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अधिकारी वर्गासोबत बैठक घेतली होती. तसंच गणेशोत्सव असल्याने सध्या तरी पाणी कपात करण्यात येणार नाही, असेही स्पष्ट केले होते. दरम्यान धरणांमध्ये पाणी साठा वाढल्याने पुणेकरांवरील पाणी कपातीचे संकट टळले आहे.
पावसाची संततधार सुरुच असल्याने धरणातील पाणी साठ्यात चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकरांवरील पाणी संकट टळले आहे, असे म्हणायला हरकत नाही. दरम्यान मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे कोल्हापूरातील राजाराम धरणही ओव्हर फ्लो झाले होते.