‘काँग्रेसने म्हटलं देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा’; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Narendra Modi | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची रास्थानच्या बन्सवाडा भागात रविवारी प्रचारसभा झाली. यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस सत्तेत आली, तर जनतेचा पैसा जास्त मुलं असणाऱ्यांना वाटून टाकेल, असं विधान त्यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावरून आता चर्चा सुरू झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?
आधी जेव्हा त्यांचं (काँग्रेस) सरकार होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. याचा अर्थ हे संपत्ती गोळा करून कुणाला वाटणार? ज्यांची जास्त मुलं आहेत त्यांना वाटणार, घुसखोरांना वाटणार. तुमच्या कमाईचा पैसा घुसखोरांना दिला जाणार का? तुम्हाला हे मान्य आहे का? काँग्रेसचा जाहीरनामाच हे सांगतोय की ते देशातील महिलांकडच्या सोन्याचा हिशोब घेतील आणि नंतर ती संपत्ती वाटून टाकतील.
हेही वाचा – “२०१४ च्या निवडणुकीचा निकाल यायच्या आधीच…”, अजित पवारांचा नवा गौप्यस्फोट!
मनमोहन सिंग सरकारनं म्हटलं होतं की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. हा शहरी नक्षलवादाचा विचार आपल्या महिलांकडचं मंगळसूत्रही वाचू देणार नाहीत. कधीकधी ते दलित आणि आदिवासी जनतेमध्ये भीती पसरवतात. सध्या काँग्रेस राज्यघटना आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर भीती पसरवत आहे. त्यांना ही गोष्ट माहिती आहे की त्यांचं हे खोटं अजिबात कामी येणार नाही. कारण दलितांना त्यांच्या अधिकारांची पूर्ण जाणीव आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.