breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘मनोज जरांगेंनी पंगतीत जेवावे, कारण..’; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली भिती

मुंबई | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथून काढलेली पदयात्रा आता नवी मुंबईच्या दिशेने येत आहे. २६ जानेवारीला ही पदयात्रा मुंबईत धडकेल. तत्पूर्वी मनोज जरांगे पाटील मुंबईत येऊ नयेत, यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. यावरून प्रकाश आंबेडकरांनी एक वेगळीच भीती व्यक्त केली आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन दडपण्यासाठी राजकीय प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकारणात काहीही होऊ शकते. यासाठी माझा सल्ला असेल की त्यांनी लोकांच्या पंगतीतच जेवण करावे. त्यांनी वेगळे जेवण केल्यास त्यांच्या जेवणात जुलाबाचे औषध टाकले जाऊ शकते. पण पंगतीच्या जेवणात मोठ्या प्रमाणात औषध टाकले जाऊ शकत नाही. जर आंदोलनाचे नेतृत्व करणारा व्यक्ती आजारी पडून रुग्णालयात दाखल झाल्यास आंदोलन भरकटते. त्यामुळे जरांगे पाटील यांनी काळजी घ्यावी.

हेही वाचा     –    मोफत गणवेश योजनेसंदर्भात मोठी बातमी! असा असणार विद्यार्थ्यांचा गणवेश 

राज्य सरकारने जरांगे यांच्याशी प्रामाणिकपणे चर्चा करावी. आठवड्याभरात देऊ, महिन्याभरात देऊ, विशेष अधिवेशन घेऊ, असे पोकळ आश्वासन देऊ नयेत. ही आश्वासने म्हणजे चॉकलेट दाखविण्याचा प्रकार आहे. जरांगे पाटील यांनाही याची कल्पना आहे. त्यामुळे राज्य सरकारने आरक्षण देण्याचे प्रामाणिक प्रयत्न करावेत आणि तसा शब्द द्यावा, असेही प्रकाश आंबडेकर म्हणाले. राज्य सरकारची प्रामाणिकता दिसली तर लोकही त्यांचे नक्कीच ऐकतील. मात्र सरकारने फसवाफसवी करण्याचा प्रयत्न केल्यास, आंदोलन आणखी तीव्र होईल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली आहे. त्यावर आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, ओबीसी आणि गरजवंत मराठ्यांना आरक्षणासाठी वेगवेगळे ताट द्यावे लागेल. अन्यथा हा प्रश्न आणखी चिघळेल. आरक्षणाचा प्रश्न जिवंत राहण्यासाठी जरांगे पाटील यांना राजकीय भूमिका घ्यावीच लागेल. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांवर सोपविला असल्याचे मला दिसते. तर दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस ओबीसींना गोंजारत आहेत. त्यामुळे हा माकडाचा खेळ सुरू आहे. हे ओबीसींनी ध्यान्यात घ्यायला हवे. भाजपा रामाचे भक्त जरी असले तरी ते ओबीसींचे भक्त नाहीत, हे देखील ओबीसी समाजाने लक्षात घ्यावे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button