महाविकासआघाडीच्या नेत्यांना राज्यपालांच्या भेटीसाठी ताटकळत राहावे लागणार ?
![Will the leaders of Mahavikasaghadi have to wait for the governor's visit?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/Maharashtra-NCPs-Nawab-Malik-says-Maha-Vikas-Aghadi-government-stable.jpg)
मुंबई – गृहमंत्री अनिल देशमुखांवरील आरोपानंतर महाराष्ट्रातील राजकारणात वादळ उठले आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप नेत्यांनी काल राज्यपालांशी भेट घेतली होती. आता महाविकास आघाडीतील नेते देखील राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली होती. मात्र राज्यपालांच्या नियोजित दौऱ्यामुळे ही भेट टळल्याचे सांगितले जात आहे.
वाचा :-महाविकास आघाडीचे नेते घेणार राज्यापालांची भेट
महाविकास आघाडीचे नेते आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार होते. मात्र, राज्यपाल देहरादूनला गेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट टळणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप विरोधक करत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांची भेट घेणार होते.
राज्यपाल देहरादून दौऱ्यावर आहेत. 28 मार्चपर्यंत ते देहरादून येथे असणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांची आजची भेट टळली आहे. राज्यपालांचा देहरादूनचा दौरा पूर्वनियोजित होता, ते 28 मार्चला मुंबईत परतणार आहेत, असं राजभवनाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे महाविकासआघाडीच्या नेत्यांना राज्यपाल कोश्यारींच्या भेटीसाठी ताटकळत राहावे लागणार आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली होती. भाजपच्या या शिष्टमंडळात देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा हे नेते होते.