अजित पवारांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न साकार होणार का? अहवालातून स्पष्ट
![Will Ajit Pawar's dream of becoming Chief Minister come true?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Ajit-Pawar-4-780x470.jpg)
मुंबई : राज्यात एकापाठोपाठ एक राजकीय उलाढाली घडत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच अजित पवार यांच्यासोबत ९ आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. याच पार्श्वभूमीवर आता अजून एक मोठी राजकीय उलाढाल होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे अजित पवार आता संसदेचे पावसाळी अधिवेशन ११ ऑगस्टला संपल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील असे वृत्त रेडिफला मिळालेल्या माहितीनुसार एका अहवालात नमूद केले आहे. तसेच शिंदे ठाकरेंच्या बंडानंतर देखील अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी नियमित संपर्कात होते असे देखील या अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा – डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलणार, पाहा काय होणार बदल
तसेच महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व १६ आमदारांना अपात्र ठरवतील, त्यानंतर त्यांना पदाचा राजीनामा देण्यास सांगितले जाईल त्यामुळे मंत्रिमंडळ बरखास्त होईल, असे रेडिफने अहवालात सांगितले आहे. मात्र हा अहवाल कितपत खरा ठरतोय आणि अजित पवारांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होणार का? याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.