२०२४ च्या निवडणुकीत मुख्यमंत्री कोण असणार? खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच केलाय खुलासा
मुंबईः
मागील काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी अलीकडेच मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. दुसरीकडे, अजित पवारांची सासरवाडी असलेल्या धाराशीवमध्ये ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असणारे त्यांचे बॅनर लागले आहेत. तर नागपुरात देवेंद्र फडणवीस यांचा ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असणारा बॅनर लागला आहे.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असणारे बॅनर लागले असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली दिल्लीत सुरू आहेत, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या सर्व घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे. २०२४ च्या निवडणुकीत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील, त्यांच्याच नेतृत्वात निवडणुका लढवू… असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
“मुलांच्या त्वचेचा रंग बदलू नये म्हणून…” जिनिलीया देशमुखचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत, म्हणाली “बाहेर उन्हात खेळायला…
हेही वाचा- “रिफायनरीसाठी बारसूची जागा उद्धव ठाकरेंनीच सुचवली”, थेट पत्र सादर करत उदय सामंतांचा दावा
नागपुरातील बॅनरबाजीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ज्यांनी कुणी माझे बॅनर लावले असतील, त्यांनी ते बॅनर काढून टाका. अशा प्रकारचा मूर्खपणा भाजपामध्ये तरी करू नका. मला वाटत नाही, बॅनर लावणारा व्यक्ती भाजपाचा असेल, पण काही अतिउत्साही लोक असतात, आपली एखादी बातमी झाली पाहिजे, आपलं नाव झालं पाहिजे म्हणून अशी बॅनरबाजी करतात.”
“पण एक गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की, एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. २०२४ च्या निवडणुकीतही तेच मुख्यमंत्री असतील. त्यांच्याच नेतृत्वात आमचं सरकार निवडणूक लढेल आणि आम्ही जिंकून दाखवू…” असं स्पष्ट विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे.





