“पश्चिम बंगालचा राजकीय इतिहास रक्तरंजित,” हिंसाचारावर खासदार संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई |
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने मिळवलेल्या जबरदस्त विजयानंतर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचार सुरु असून भाजपा तसंच इतर पक्षांनी तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरलं आहे. हिंसाचारात ११ जणांचा मृत्यू झाला असून केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंबंधी सविस्तर अहवाल मागवला आहे, तर भाजपानेही देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हिंसाचार रोखणं ही सत्तेत असणाऱ्या पक्षाची जबाबदारी असल्याचं म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरु असल्याचा बातम्या फार चिंताजनक आणि दु:खद आहेत. पश्चिम बंगालच्या जनतेने ममता बॅनर्जी यांना जोरदार बहुमत दिलं आहे. पश्चिम बंगालचा निर्णय ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे.
देशातील जनतेच्या मनातील प्रतिक्रिया तिथे उमटली आहे. असं असताना दोन्ही बाजूंनी संयम राखणं गरजेचं आहे. विशेषत: जो पक्ष सत्तेत असतो त्यांचं हे काम असतं. पण टाळी एका हाताने वाजत नसते,” असं राऊत म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले की, “दुर्दैवाने पश्चिम बंगालचा राजकीय इतिहास हा नेहमीच रक्तरंजित आणि हिंसाचाराने भरलेला आहे. देशाची स्थिती ही अत्यंत गंभीर आहे. सगळ्यांनी निवडणुकांमधील मतभेद-वाद मिटवून करोनाविरोधात लढण्याची गरज असताना सुद्धा हे का होत आहे याचा विचार दोन्ही बाजूंनी करायला हवा. एकमेकांना धमक्या इशारे देणे थांबवायला पाहिजे”. “हिंसाचार घडवण्यात खतपाणी घालणारे हे पश्चिम बंगालमधील आहेत की बाहेरून कोणी याला उत्तेजन देत आहे हे देखील पाहायला हवं,” असंही संजय राऊत म्हणाले.
वाचा- अदर पूनावाला यांना सुरक्षा देणार का?; खासदार संजय राऊतांनी दिलं उत्तर