सत्तेवर येताच तोडगा काढू ,वडेट्टीवार;मराठा व ओबीसी समाजाला एकत्र आणू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/mahaenews-17-1-780x470.jpg)
नागपूर : ‘‘मराठा समाजाच्या अनेक नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केले आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना दिली जात असलेली शिष्यवृत्ती ही माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची देण आहे. जरांगे असो वा हाके… सर्वांनी एकत्र आले पाहिजे. ज्या दिवशी आम्ही सत्तेत येऊ, त्या वेळी दोन्ही समाजाला समोर बसवून तोडगा काढू,’’ असे आश्वासन विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. सध्या मराठवाड्यात एकमेकांचे कोणी तोंड बघत नाही. ही आग कोणी लावली, हे सर्वांना ठाऊक असल्याचेही ते म्हणाले.
कोणी हक्कासाठी लढत असेल तर त्यांची भेट घेणे हे आमचे कर्तव्यच आहे. लक्ष्मण हाके ओबीसींच्या हक्कासाठी उपोषणाला बसले आहेत. ओबीसी म्हणून आपण त्यांना भेटण्यास गेले होतो. विषय गंभीर असेल आणि तो तेवढ्याच तळमळीने मांडला जात असले तर सर्वांसाठीच आमच्या डोळ्यात अश्रू येतात, अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी जरांगे पाटील यांना सुनावले. ओबीसीसाठी उपोषणाला बसलेल्या हाके यांच्याकडे बघून वडेट्टीवार यांना अश्रू आले होते. यावरून काही जणांनी त्यांना ट्रोल करणे सुरू केले. यास वडेट्टीवार यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. जरांगे आमच्या डोळ्यात सर्वांसाठीच अश्रू येतात हे सांगण्यासही ते विसरले नाही. मी लक्ष्मण हाके यांना भेटलो, तो पर्यंत सरकारने त्यांना गंभीरपणे घेतले नव्हते, असेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, की ओबीसी समाजाची संख्या ६० टक्क्यांच्या आसपास आहे. त्यांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या आंदोलनाकडे न बघणे, हा ओबीसी समाजाचा अपमान आहे. उपोषणकर्त्यांची प्रकृती नाजूक आहे. सरकारची भूमिका दुजाभाव करणारी नसावी. मुख्यमंत्र्यांनी भेटायला जाण्याची घोषणा केली आहे. यावर लवकरात लवकर तोडगा निघावा, एवढीच आमची अपेक्षा आहे. कायद्याच्या चौकटीत बसणारी आश्वासने दिली जात असली तर हरकत नाही. मात्र, मतांच्या लाचारीसाठी आश्वासने देऊन वेळ मारून नेली जात आहे. नंतर ती न्यायालयात टिकत नाहीत. सरकारचे आश्वासने देण्याचेच धंदे सुरू आहेत.