पाणी प्रश्न पेटला, धुळे महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हंडा मोर्चा
![पाणी प्रश्न पेटला, धुळे महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हंडा मोर्चा](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/पाणी-प्रश्न-पेटला-धुळे-महानगरपालिकेवर-राष्ट्रवादी-काँग्रेस-पक्षाचा-हंडा-मोर्चा.jpg)
धुळे : शहरात नऊ ते दहा दिवसाआड होत असलेला पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने धुळे महापालिकेवर हंडा मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. धुळे शहरासह जिल्ह्याचे तापमान ४२ ते ४४ अंशावर पोहोचले असून उन्हात नागरिकांना भीषण उन्हाच्या झळांसोबत भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विविध प्रकल्पांमध्ये मुबलक जलसाठा शिल्लक असून देखील शहरात नऊ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. याबाबत वारंवार आंदोलन करून देखील पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मनपातील सत्ताधारी भाजपचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून झाशी राणी पुतळा पासुन आज हंडा मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. वर्षातील ३६५ दिवसांपैकी फक्त ५५ दिवस शहराला पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांनी यावेळी केला. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास अधिकाऱ्यांना दालनात न बसू देण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने यावेळी देण्यात आला. दरम्यान, प्रचंड जलसाठा उपलब्ध असूनदेखील नियोजनशून्य आणि गलथान कारभारामुळे धुळे शहराला १० ते १२ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याची बातमी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ने दाखवली होती आणि ह्याच बातमीची दखल घेऊन शिवसेनेने देखील कवाड आंदोलन करून मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले होते.