उद्धव ठाकरे ‘अकेला चलो’चा नारा देणार? ठाकरे गटातील नेत्याची माहिती
वंचितला महाविकास आघाडीत घेण्यासाठी सर्वात मोठा विरोध अजित पवारांचा होता
मुंबई : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील मोठी फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.
खासदार विनायक राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे आपली भूमिका येत्या दोन दिवसांत स्पष्ट करतीलयच, पण एक मात्र नक्की. महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला, शिवसैनिकांना असं वाटतंय की आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वतंत्र चलो, अकेला चलो हा नारा द्यावा आणि पुढच्या राजकीय कामकाजात सहभागी व्हावं. ही सर्वसामान्य जनतेची भावना आहे.
हेही वाचा – ‘अजित पवार मुख्यमंत्री होण्याची शक्यता’; पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान
प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरेंच्या दोन वेळा बैठका झाल्या. पण वंचितला महाविकास आघाडीत घेण्यासाठी सर्वात मोठा विरोध अजित पवारांचा होता. प्रकाश आंबेडकर बेभरवशाचे आहेत. ते आयत्यावेळी तुम्हाला फसवतील, असं अजित पवार वारंवार सांगायचे. आता प्रकाश आंबेडकर आहे तिथेच आहेत, पण अजित पवारांनी उडी मारली, असा टोलाही विनायक राऊतांनी लगावला.
अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील – संजय राऊत
अजित पवारांचा शपथविधी एकनाथ शिंदेना पर्याय म्हणून करून घेण्यात आला असून अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील. तसेच, येत्या १० ऑगस्टपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची अंमलबजावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना करावीच लागेल, त्यानुसार शिंदेसह १६ आमदार अपात्र ठरतील, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.