‘तेलंगणात भाजपने जीवाचं रान केलं, पण..’; काँग्रेस नेत्याचा भाजपाला खोचक टोला
![Vijay Wadettiwar said that people rejected BJP in Telangana](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Narendra-Modi-and-Rahul-Gandhi--780x470.jpg)
मुंबई : तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी होत आहे. आत्तापर्यंतच्या कलात काँग्रेस आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तेलंगणा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, तेलंगणा, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या चारही राज्यात काँग्रेस आघाडीवर आहे. हे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं फळ आहे. दक्षिण भारतात भारतीय जनता पक्षाने जीवाचं रान केलं. मात्र लोकांनी त्यांना नाकारलं आहे. आजच्या निकालातून ते स्पष्टपणे दिसतंय. राहुल गांधी प्रियंका गांधी आणि मलिकार्जुन खरगे यांनी जी मेहनत केली.
हेही वाचा – अंधारामध्ये आपण मिळून आणू प्रकाश; “सप्तर्षी फाउंडेशन”
राज्यातील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारं सरकार जनतेला आता नको आहे. काँग्रेसने सर्व जाती धर्मला एकत्र घेतलं. द्वेषाचं राजकारण इथे चालत नाही. इथे देशाचं राजकारण चालतं. समाजात धर्मात विष पेरण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं. त्याला सडे तो उत्तर या चार राज्यातील निकालातून भारतीय जनता पक्षाला मिळणार आहे. चारही राज्यात काँग्रेस जिंकणार हा कार्यकर्त्यांकडून फीडबॅक मिळालेला आहे. त्या आधारावरती आम्हाला जिंकण्याचा विश्वास आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
राजस्थानमध्ये आता आम्ही मागे असलो तरी बहुमताने सरकार स्थापन करणार हा आमचा विश्वास आहे. विद्यमान सरकारच्या बाबतीत कुठलाही प्रकारचा आरोप नव्हता. त्यामुळे जनतेने काँग्रेसला पसंती दिली. शंभर टक्के काँग्रेस जिंकणार आहे. राजस्थानमध्ये ११५ ते १२० जागा येऊन आम्ही जिंकणार आहे, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.
तेलंगणात काँग्रेसला बहुमत
तेलंगणात विधानसभेसाठी ११९ जागांवर मतदान झाले. काँग्रेस ६२ जागांवर आघाडी घेऊन बहुमताकडे वाटचाल करत आहे. बीआरएसने केवळ ४३ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपला ९ जागा मिळण्याची शक्यता आहे.