‘जरांगेच्या मागणीमुळे मराठा तरूणांचं मोठं नुकसान होणार’; काँग्रेस नेत्याचं विधान
मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. दरम्यान, यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे. सरसकट कुणबी आरक्षणाच्या मागणीमुळे मराठा तरुणांचं खूप मोठं नुकसान होणार आहे. मराठा तरुणांनी याचा अभ्यास करावा, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
विजय वडेट्टीवार म्हणाले, मराठा समाजाला १० टक्के ईडब्ल्यूस आरक्षणातून फायदा होत असेल, तर तो मोठा फायदा आहे. परंतू मनोज जरांगे पाटील यांना ईडब्ल्यूस आरक्षणापेक्षा राजकीय आरक्षणाचा फायदा घेण्याची भूमिका असावी. म्हणून ते आग्रही आहेत. मनोज जरांगे मराठा मुलांच्या भल्यासाठी आग्रही नाहीत, तर राजकीय फायद्यासाठी आग्रही आहेत, असा माझा त्यांच्यावर थेट आरोप आहे.
हेही वाचा – ‘शरद पवारच खरे ओबीसी नेते कारण..’; बच्चू कडूंचं विधान चर्चेत
सरसकट कुणबी आरक्षणाच्या मागणीमुळे मराठा तरुणांचं खूप मोठं नुकसान होणार आहे. मराठा तरुणांनी याचा अभ्यास करावा. त्यांनी जरांगे पाटलांच्या म्हणण्याप्रमाणे सगळे काही ठरवू नये. अभ्यास करून त्यांच्या भविष्याचा निर्णय घ्यावा, असं माझं त्यांना आवाहन आहे. मुळात मराठा समाज ओबीसींच्या ३७२ जातींमध्ये येऊन फार फायदा होणार नाही. ईडब्ल्यूस आरक्षणात फार जाती नाहीत, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
खुल्या प्रवर्गात फार जाती शिल्लक राहणार नाहीत. म्हणजे नोकऱ्यांचा किंवा सवलतीचा जिथं संदर्भ येतो तेथे मराठा तरूणांचं फार मोठं नुकसान होणार आहे. अशास्थितीत मराठा तरूणांनी अभ्यास करून हित काय याचा विचार करावा, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.