‘७० हजार कोटी खाणारा बंदर मांडीवर जावून बसला आणि पोपट झाला’; काँग्रेस नेत्याचा अजितदादांना खोचक टोला
![Vijay Wadettiwar said that Bandar, which ate 70 thousand crores, sat on his lap and became a parrot](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Ajit-Pawar-780x470.jpg)
मुंबई : महाराष्ट्र सदन बांधला सुंदर आणि भुजबळ गेला अंदर. भ्रष्टाचाराच्या आरोपात अंदर झालेले आता बंदर बनून मांडीवर बसले आहेत. मांडीवर बसलेले हे बंदर आता पोपट बनून बोलायला लागले आहेत, अशी खोचक टीका राज्याचे विरोधीपक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, ७० हजार कोटी खाल्यानंतर बारामतीचा मीटू आता पोपट झाला आहे. महाराष्ट्र सदन बांधला सुंदर आणि भुजबळ गेला अंदर. भ्रष्टाचाराच्या आरोपात अंदर झालेले आता बंदर बनून मांडीवर बसले आहेत. मांडीवर बसलेले हे बंदर आता पोपट बनून बोलायला लागले आहेत. खासदारांची स्थिती गुलामासारखी झाली आहे. ते काहीच बोलू शकत नाही. देवाजी बापू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजाभाऊ खोबरागडे यांच्या काळातही मतभेद होते. मतांतरे होती, मात्र विचार लोकशाहीसाठी होता. स्वातंत्र्य टिकण्यासाठी व स्वातंत्र्यासाठी होता. उपेक्षितांसाठी या सर्वांनी लढाई केली. मात्र, आज यांच्या लेखी दलित, उपेक्षित, बहुजन नाही, तुम्हा आम्हा सर्वांना गुंडाळून मनुवादी विचारांचा देश उभा करण्याचे काम सुरू झाले आहे.
हेही वाचा – महाराष्ट्राच्या ‘महानंद’चा कारभार गुजरातमधून चालणार? नेमकं प्रकरण काय?
मी देव पाहिलेला नाही, मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपात मला देव भेटला. मी इथं पर्यंत पोहचलो, ही त्यांची पुण्याई. जर तुम्ही पुन्हा चूक कराल तर नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाही. मी माझ्यासाठी, माझ्या पक्षासाठी मत द्या यासाठी हे बोलत नाही. संविधान आणि लोकशाही वाचवण्याची ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
कुणाची जात कधी काढू नये. पण कधीकधी काढावी लागते. सत्ता, संपत्ती काही मर्यादित लोकांच्या हातात गेली आहे. देशातील वातावरण दूषित झालेलं आहे. जाती-जातीत, धर्मा-धर्मात लढविण्याचे काम सुरू आहे. २०२४ची लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची असणार आहे. मी बाळासाहेब आंबेडकराना विनंती करतोय, सर्व बहुजनांन आता एक व्हावे लागेल, नाही तर ते सर्वात आधी आमचा बंदोबस्त करतील. या देशात गुजराती, मारवाडी आणि तीन टक्के लोकसंख्या असलेल्यांचीच सत्ता आहे. तुम्ही-आम्ही काही नाही. ते हो म्हणतील तर हो म्हणा, नाही म्हणतील तर नाही म्हणा, अशी स्थिती निर्माण झाली आहे, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.