अजित पवारांचा अपघात आहे की घातपात? विजय वडेट्टीवारांचा सवाल

मुंबई | महाविकास आघाडीने अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत अधिवेशनाआधी होणाऱ्या पारंपरिक चहापानावर बहिष्कार जाहीर केला. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले.
विजय वडेट्टीवार म्हणाले, भाजपाचं घोषवाक्य होतं कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र. आज आमचा प्रश्न तोच आहे की महाराष्ट्र आज कुठे आहे? शेतकरी, सामान्य माणूस सगळे कुठे आहेत? महाराष्ट्र ड्रग्जच्या विळख्यात अडकला आहे. त्यामुळे कुठे आहे महाराष्ट्र हा प्रश्न निर्माण होतो.
हेही वाचा : स्वीकृत नगरसेवकांवरून ठाकरे बंधूंमध्ये मिठाचा खडा? चर्चांना उधाण
राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. शासनाने फक्त दोन ओळींचं स्पष्टीकरण दिलं जातं की अपघातावर कुणीही प्रश्न निर्माण करु नये. का करु नये? हा घातपात आहे की अपघात आहे? याची देशभरात चर्चा सुरु आहे. अशा वेळी आम्ही अधिवेशनाच्या आदल्या दिवशी होणाऱ्या चहापानाला का जायचं? शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणारे निर्णय सरकारने घेतले आहेत. सोयाबीन, कापूर उत्पादक या सगळ्या शेतकऱ्यांचं नव्या करारामुळे नुकसान होतंय. कापूस खरेदी निम्म्यावर आणली आहे. शेतकऱ्यांच्या संदर्भात सरकारला काळजी नाही.मका शेतकरी २४०० रुपये एमसएसपी होता, महाराष्ट्रात १५०० ते १६०० रुपये दिले गेले. व्यापाऱ्यांनीही शेतकऱ्यांना जिवंतपणी मरण यातना देण्याचं काम केलं. यवतमाळमध्ये एका महिन्यात २२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मराठवाड्यात ७६ शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं. पोट भरलेल्या या लोकांना काहीही पडलेलं नाही. शेतकरी विरोधी सरकारच्या चहापानावर आम्ही बहिष्कार घातला आहे. असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.




