“वसंतभाऊ मला म्हणाला होतात, तू राजकीय आत्महत्या केली, आता पक्षाने तुमची हत्या केली की!”
!["Vasantbhau would have told me, you committed political suicide, now the party has killed you!"](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/more-rupali.jpg)
पुणे |
मनसेचे डॅशिंग नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांना राज ठाकरेंनी मोठा दणका दिलाय. मशिदीवरील भोंग्यासंदर्भात पक्षाच्या भूमिकेला विरोध केलेल्या वसंत तात्यांना राज ठाकरेंनी पदावरुन बाजूला केलंय. आश्चर्य म्हणजे वसंत मोरे यांच्या भूमिकेला अनुकूल भूमिका घेतलेल्या साईनाथ बाबर यांच्याकडे राज ठाकरे यांनी पुणे शहराची धुरा सोपवलीय. मनसेच्या या सगळ्या अंतर्गत खेळीवर नुकत्याच मनसेतून राष्ट्रवादीत गेलेल्या रुपाली पाटलांनी संताप व्यक्त केलाय. या सगळ्या प्रकरणात रुपाली पाटील यांनी वसंत मोरे यांची बाजू घेतली खरी पण यावेळी त्यांनी वसंत मोरे यांच्या जुन्या वक्तव्याची त्यांना आठवण करुन दिलीय. ‘मी मनसेतून राष्ट्रवादीत येताना तुम्ही म्हणाला होतात, तुझी राजकीय आत्महत्या असेल, पण वसंत भाऊ आता तुमची पक्षाने तर हत्या केली की…..!’ , असं म्हणत रुपाली पाटलांनी वसंत मोरे यांना डिवचलं. तसंच बहिण म्हणून तुमच्या पाठीमागे नेहमीच उभी असेल, असा आधारही दिला.
- ‘पक्षाने तुमची हत्या केली की!’
“वसंत मोरे यांना पदावरुन हटवलं जाणं हे निश्चित अन्यायकारक आहे. काम करणाऱ्या माणसाला पदावरुन बाजूला सारणं हे मनसेतील अंतर्गत राजकारण आहे. पण मला मागील प्रसंगाची आठवण येते. ज्यावेळी मी मनसेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी वसंत भाऊंनी प्रसारमाध्यांना प्रतिक्रिया देताना, ही माझी राजकीय आत्महत्या असेल, असं म्हटलं. आता मला वसंत भाऊंची तीच प्रतिक्रिया आठवली. आता मनसेने तर भाऊंची राजकीय हत्या केली की…”, असं रुपाली पाटील म्हणाल्या. - वसंत मोरेंचं काम १ नंबर, त्यांच्या भूमिकेतही दम
मनसेच्या अंतर्गत राजकारणातून वसंत मोरे यांना पदावरुन दूर सारण्यात आल्याचा संशय रुपाली पाटील यांनी व्यक्त केलाय. वसंत मोरे यांच्या कामाचं कौतुक करत त्यांच्या भूमिका या जनसामान्यांच्या असतात, लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना त्यांच्या कामाला तोड नाही, असं म्हणत रुपाली पाटलांनी वसंत मोरेंचं तोंडभरुन कौतुक केलंय. दुसरीकडे त्यांनी मनसेच्या किशोर शिंदे यांना मात्र, माणसांमध्ये जाऊन पक्ष वाढवून दाखवा, असं चॅलेंजही केलंय. - मनसेत अंतर्गत राजकारणाला ऊत, त्यामुळेच मी मनसेला सोडचिठ्ठी दिली
मनसे पक्षात अंतर्गत राजकारण खूप आहे. याच अंतर्गत राजकारणाला कंटाळून मी पक्षाचा राजीनामा दिला. वसंत मोरे यांच्यावर केलेल्या कारवाईचं मला वाईट वाटलं. पण साईनाथ बाबर यांच्यावर पक्षाने सोपविलेल्या जबाबदारीचं मला आश्चर्य वाटलं कारण वसंत मोरे यांना अनुकूल असलेलीच भूमिका साईनाथ बाबरने घेतली होती मग, एकाला हटवलं, दुसऱ्याकडे पद दिलं, हे असं का?, असा सवालही रुपाली पाटील यांनी उपस्थित केला.