‘..तर तुमचा पराभव निश्चित समजा’; वसंत मोरेंचा सरकारला इशारा
![Vasant More said that the administration has laid the roads of Pune city](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/vasant-more-780x470.jpg)
प्रशासनाने पुणे शहराचे वाटोळे लावले आहे
जो मनातून हारतो तो रणात काय जिंकणार
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी कसबा पेठ आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीचा दाखला देत पुणे महापालिकेची निवडणुक घेण्याची मागणी केली आहे. वसंत मोरे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी प्रशासनाकडून पुण्याचं वाट लावण्याचं काम सुरू असल्याचा आरोप केला आहे.
माझा शिंदे-फडणवीस सरकारला एक प्रश्न आहे, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाचे २ आमदार नुकतेच मयत झाले. आजुन त्यांच्या सरणाची राख निवली सुद्धा नसेल, तर तुम्ही तुमची मते कमी होतील म्हणून लगेच त्या त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या, मग मागील एक वर्षापासून आमच्या शहराला कोणताही लोकप्रतिनिधी (नगरसेवक) नाही. प्रशासनाने शहराचे वाटोळे लावले आहे, असा आरोप केला आहे.
विकास कामे ठप्प झाली आहेत निधी नसल्यामळे नागरिकांना थोबाड दाखवू वाटत नाही.., पुण्यातील आमदार खासदारांनी जरा आमच्या चपलेत पाय घालून पहावे आणि हो जर कोणत्या पक्षाला सहनुभुती मिळेल म्हणून जर निवडणुका टाळत असताल तर तुमचा पराभव निश्चित समजा कारण जो मनातून हारतो तो रणात काय जिंकणार, असा टोलाही वसंत मोरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.