‘अजित पवारांना भाजपा कधीही मुख्यमंत्री करणार नाही’; नेमकं असं कुणी म्हटलं?
नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. यावेळी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. अजित पवार यांना मुख्यमंत्री करा, मी पाठिंबा देतो, असं भास्कर जाधव म्हणाले. यावरून ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी सूचक विधान केलं आहे. ते नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
वैभव नाईक म्हणाले, भारतीय जनता पार्टी प्रत्येकाचा वापर करून घेते. भाजपाने गेली २५ वर्षे शिवसेनेचा वापर केला. उद्धव ठाकरे यांनी पुढे शिवसेनेचा वापर करू दिला नाही, म्हणून आमची युती तुटली. तसेच भाजपा अनेकवेळा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करण्यास इच्छुक होती. अनेकदा बोलणीही झाली.
हेही वाचा – ‘ड्रग्सप्रकरणी कोणालाही पाठीशी घालणार नाही’; देवेंद्र फडणवीस
भाजपाने अजित पवार यांचा वापर राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यासाठी केला आहे. त्यामुळे अजित पवारांना भाजपा कधीही मुख्यमंत्री करणार नाही. कारण लोकांमध्ये असलेला नेता भाजपाला आवडत नाही आणि परवडत नाही, हे अनेकदा आपण बघितलं आहे. त्यांना फक्त त्यांच्या ताटाखालचे मांजर पाहिजे असतात. त्यामुळे ते अजित पवारांना कदापि मुख्यमंत्री करणार नाहीत. त्यामुळे भास्कर जाधव यांनी उपरोधिकपणे विधान केलं आहे, असंही वैभव नाईक म्हणाले.