‘तीन महिन्यांत राज्यातील सरकार पडणार’; शरद पवार गटाच्या आमदाराचा मोठा दावा
Uttam Jankar | राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते तथा माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला आव्हान दिलं आहे. तसेच यावेळी त्यांनी एक विधान केलं आहे, त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळाच मोठी चर्चा रंगली आहे. पुढच्या तीन महिन्यांत राज्यातील सरकार १००० टक्के पडणार म्हणजे पडणार, असा मोठा दावा आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे.
उत्तम जानकर म्हणाले, की गेल्या एक महिन्यांपासून मी ईव्हीएम संदर्भात आंदोलन करत आहे. जे माझ्या तालुक्यात झालं, तेच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी झालेलं आहे. मी बारामतीचा अभ्यास केला, त्या ठिकाणी अजित पवार २० हजार मतांच्या फरकाने पराभूत आहेत. जयकुमार गोरे हे १३ हजार मतांच्या फरकाने पराभूत आहेत. आता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रॉपर्टी भेट देणं किंवा नाही देणं यासाठी माझा लढा नाही.
हेही वाचा – काश्मीरचे नामांतर होणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी दिले संकेत; म्हणाले..
या सरकारला आणि निवडणूक आयोगाला माझं आव्हान आहे की, एकतर सर्व निवडणुका घ्या. पण तुम्ही त्या घेणार नाहीत. पण बारामती आणि मी देखील राजीनामा द्यायला तयार आहे, माझ्या बरोबर अजित पवारांचाही राजीनामा घ्या. मग मला पाहायचं आहे की अजित पवार १० हजार मतांनी तरी निवडून येतात का? मी हे आव्हान देत आहे. अजित पवार आणि माझी पोटनिवडणूक एकाच वेळी व्हावी. मग देवेंद्र फडणवीस असो किंवा रणजितसिंह नाईक निंबाळकर, मी त्यांना आज आव्हान देतो राज्यातील नाही फक्त या दोन्ही (बारामती आणि माळशिरस) मतदारसंघाची पोटनिवडणूक बॅलेटवर घ्या. तुम्ही ही निवडणूक घेत नाहीत तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही, असं उत्तम जानकर म्हणाले.
मी सरकारला आठ दिवसांपूर्वी चार महिन्यांचा अल्टिमेटम दिला होता. आता त्यामधून चार दिवस कमी झालेले आहेत. आता ३ महिने २६ दिवस बाकी राहिले आहेत. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की, राज्यातील हे महायुतीचं सरकार १००० टक्के जाणार म्हणजे जाणार. ज्यावेळी सर्वांसमोर मी पुरावे सादर करेन तेव्हा राज्य आणि देश गडबडून जाईल. मात्र, त्यानंतर या सत्ताधाऱ्यांना कोणताही पर्याय राहणार नाही. त्यामुळे मी वारंवार सांगतोय की माझ्या मतदारसंघाची तरी पोटनिवडणूक तुम्ही बॅलेटवर घ्या, असंही उत्तम जानकर म्हणाले.