उद्धव ठाकरेंचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना इशारा; म्हणाले..
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील ४० आमदारांनी बंडखोरी केली. यानंतर ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रेसंदर्भात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपावला आहे. यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजूनही याबाबत निर्णय घेतलेला नाही. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांना थेट इशारा दिला आहे.
तुम्हाला अपात्र ठरवलं जाऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या सर्वच आमदारांना पाठवली आहे. यावरून आता उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या चौकटीतच विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल. त्यांनी न्यायालयाच्या चौकटीबाहेर निर्णय दिला तर तो लोकशाहीला धरूण नसेल. असं झालं तर सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे आमच्यासाठी उघडे असतील.
हेही वाचा – महत्वाची बातमी! आधार, रेशन कार्ड लिंक करण्यासाठीची मुदत वाढली
त्यांचा काहीही अर्थ काढायचा प्रयत्न केला तरी सर्वोच्च न्यायालयाने जो अर्थ काढून दिली आहे, त्याच्या पलीकडे कुणालाही जाता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट शब्दांत निकाल दिला आहे. त्या निकालाच्या चौकटीतच विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या चौकटीबाहेर निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर ते लोकशाहीला धरूण होणार नाही आणि तसं अध्यक्ष वागतील, अशी माझी अजिबात अपेक्षा नाही. त्यांनी जर तसा निर्णय घेतला, तर सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे आमच्यासाठी तेव्हाही उघडे असणारच आहेत. आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.