‘तुम्ही सत्तेसाठी मिंध्यांचं काय चाटत आहात?’; उद्धव ठाकरेंची भाजपवर घणाघाती टीका
लालू प्रसाद यादव यांचं सरकार पाडून तुम्ही नितीशकुमार यांचं काय चाटत होतात?
महाविकास आघाडीची काल छत्रपती संभाजीनगर येथे वज्रमूठ सभा घेण्यात आली होती. या सभेला महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीकास्त्र सोडलं.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नाव घेतो आणि पाठीत वार करतो? बरं ठीक आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेसाठी एकत्र आलो होतो. हो आलो होतो. पण आता सत्ता गेल्यानंतरही आम्ही एकत्र आहोत. उलट आता आम्ही अधिक घट्ट आहोत.
मध्यंतरी अमित शाह पुण्यात येऊन गेले. त्यांनी माझ्यावर आरोप केले. मी सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तळवे चाटले, असं ते म्हणाले. मला शिवसेना प्रमुखांची भाषा येत नाही, असं नाहीये. पण मला आवरावं लागतं. काही शब्द, भाषा त्यांनाच (बाळासाहेबांनाच) शोभणारी आहे. मला ती भाषा शोभणारी नाही. पण मी त्यांना (अमित शाह) फक्त एवढंच म्हणालो की, आम्ही सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटत होतो. तर तुम्ही सत्तेसाठी मिंध्यांचं काय चाटत आहात? अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी अमित शाह आणि भाजपवर केली आहे.
बिहारमध्ये आधी नितीशकुमार आणि लालू प्रसाद यादव यांचं सरकार होतं. आता तेच सरकार पुन्हा स्थापन झालंय. चांगली चाललेली सरकारं फोडायची, हा किती भयानक प्रकार आहे. पण त्यावेळी नितीशकुमार आणि लालू प्रसाद यादव यांचं सरकार पाडून तुम्ही नितीशकुमार यांचं काय चाटत होतात? हा माझा सवाल आहे. आता तुम्ही संगमांसोबत सत्तेत आहेत. पण त्याच संगमांवर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मग संगमांनी हिसका दाखवल्यानंतर आता तुम्ही संगमांचं काय चाटत आहात? असंही उद्धव ठाकरे म्हणाले.