‘उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन सुरू’; उद्धव ठाकरेंचा टोला
मुंबई | राज्यातील चार विधानपरिषदेच्या जागांसाठी आज मतदान होत आहे. मुंबईत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी, नाशिकमध्ये शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदानप्रक्रिया पार पडत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच होत असलेल्या या निवडणुकीत पुन्हा एकदा महायुती आणि मविआ असा संघर्ष पाहायला मिळत आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी आज उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकेर आणि तेजस ठाकरे यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी माध्यमांशी बोलत असताना त्यांनी महायुती सरकावर टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार शिवसेनेच्या पाठिशी उभे राहतील याची मला खात्री आहे. पदवीधर मतदारसंघातील आमचे उमेदवार अनिल परब यांचा विजय आता उघड आहे. उद्यापासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होत आहे. महायुतीच्या खोके सरकारचे हे निरोपाचे अधिवेशन आहे. उद्या माध्यमांशी बोलताना राजकीय विषयाबाबत भूमिका मांडेन, असं ते म्हणाले.
हेही वाचा – भारत-इंग्लंड सेमीफायनल पावसामुळे रद्द झाल्यास कोणता संघ फायनलमध्ये जाणार? वाचा..
दरम्यान, उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज सरकारतर्फे चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मात्र विरोधकांनी परंपरेनुसार चहापानावर बहिष्कार घातला. शेतकऱ्यांचे प्रश्न, कायदा व सुव्यवस्था आणि भ्रष्टाचारासारख्या विषयांवर सरकार गंभीर नाही, असा आरोप विरोधकांनी केला आहे.