शरद पवारांना फोडाफोडीचं नोबल दिलं पाहिजे; उदयनराजे भोसलेंचा टोला

सातारा | खासदार शरद पवारांना राजकारणातील फोडाफोडीचे नोबेल पारितोषिकच दिले जावे, असा टोला भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावला आहे. तसेच, शरद पवरांचा पूर्वी बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व आठही जागांवर महायुतीचेच उमेदवार मताधिक्याने विजयी होतील असा ठाम विश्वासही उदयनराजे यांनी व्यक्त केला आहे. ते कराडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
खासदार उदयनराजे म्हणाले, की राजकीय फोडाफोडी झाली कोण कोणीकडे गेले तरी, खरा मुद्दा जनतेच्या विकासाचा. आणि जनविकासाचे प्रचंड काम भाजप आणि महायुतीने केल्याने सातारा जिल्हा हे पूर्वी कोणाचेही प्रभावक्षेत्र असलेतरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, उमेदवारांनी विकासाच्या प्रगतीपुस्तकावर बोलावे असे आव्हान देत लोक विकासकामांना म्हणजेच आमच्या उमेदवारांनाच निवडून देतील.
कराड- चिपळूण रेल्वे मार्ग व्हावा अशी आपली अशी इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युतीच्या काळात मी महसूल राज्यमंत्री असताना, दुष्काळी भागासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाची कल्पना मांडली. आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंढे यांनी प्रत्यक्षात सुरु केली. त्यातून जलसिंचनाचे प्रचंड कामही झाले. परंतु, ज्येष्ट्नेते शरद पवारांनी दुष्काळी जनतेला जाणीवपूर्वक पाण्यापासून वंचित ठेवल्याची टीका उदयनराजेंनी केली.
हेही वाचा – महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
मराठा आरक्षणाच्या मागणीचे प्रमुख आंदोलक मनोज जरांगे यांनी जाहीर केलेल्या राजकीय भूमिकेबाबत उदयनराजेंनी नाराजी व्यक्त केली. मनोजची मराठा आरक्षणाची मागणी रास्त आहे. पण, त्याचे राजकीय भांडवल करणे, भाजपवर रोष व्यक्त करणे योग्य नाही. जाती-पातीत भेदभाव हे सारे चुकीचे असल्याचे खंत उदयनराजेंनी व्यक्त केली.
डॉ. अतुल भोसले यांनी यांनी प्रचंड विकासकामे केल्याने ते प्रचंड मतांनी निवडून येतील, मला सभेला व प्रचारालाही येण्याची गरज भासणार नाही, सगळे बरोबर आहेत, सगळं व्यवस्थित होईल असा ठाम विश्वास व्यक्त करताना केवळ निवडणुकीपुरते येणाऱ्यांना जनता मते देणार का? असा प्रश्न उदयनराजेंनी उपस्थित केला.
आमदार रामराजे निंबाळकरांना माझा मुजरा. त्यांच्यामुळे फलटणच्या जागेची थोडी अडचण वाटते. परंतु, ते काही वेगळा विचार करतील असे वाटत नाही. माण-खटाव मतदारसंघात भाजपचे उमेदवार आमदार जयकुमार गोरे यांनी विकासकामे केलीत त्यामुळे तिथेही काही गडबड होणार नसल्याचाही विश्वास खासदार उदयनराजे यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला.





