‘आमच्या उठावाने आडवे झाले ते आता उठण्यासाठी..’; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

Eknath Shinde : आज दोन्ही ठाकरे एकत्र येत झालेल्या विजयी मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. त्यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, उठण्याची भाषा कोण करतंय, त्यासाठी मनगटात जोर लागतो, फक्त तोंडाच्या वाफा सोडून उपयोग नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या बंडाचीही यावेळी आठवण केली. ते म्हणाले, तीन वर्षांपूर्वी आपण उठाव केला, त्यातून हे आडवे झाले. आता उठण्यासाठी कुणाचातरी हात धरण्याचा प्रयत्न केला जात आहे अशी टीकाही त्यांनी राज-उद्धव यांच्या एकत्र येण्यावर केली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पुष्पा चित्रपटातील डॉयलॉग मारत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. गद्दार कायम झुकलेलेच असतात, उठेगा नही साला असं म्हणतात, त्यांच्या या टीकेवर शिंदे यांनी वरील टीका केली.
एकाने मराठीबद्दल असलेली तळमळ बोलून दाखवली. दुसऱ्याने मात्र, सत्तेची मळमळ बोलून दाखवली. कोणत्याही पक्षाचा झेंडा आणि अजेंडा नको असं ठरलं होतं. ते फक्त एकाने पाळलं. दुसऱ्याने मात्र स्वार्थाचा अजेंडा राबवला असं म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा समाचार घेतला. त्यासोबतच, शिंदे यांनी राज यांच्यावर फार काही बोलण यावेली टाळलं.
एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी असा नारा देत मराठीच्या मुद्द्यावर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं मनोमिलन झालं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा विजयी मेळावा आज अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरला. तब्बल 19 वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एका व्यासपीठावर आले. वरळी डोम इथे हा भव्य-दिव्य मेळावा झाला.