मग मला निवडणूक लढायला सांगायचं नव्हतं ना? छगन भुजबळांचा अजितदादांवर अप्रत्यक्ष निशाणा

Chhagan Bhujbal | महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक मोठ्या नेत्यांना स्थान देण्यात आलेलं नाही. काही नेत्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यामुळे काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांना देखील मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे भुजबळ नाराज आहेत. दरम्यान, भुजबळ यांनी पुन्हा एकदा आपली नाराजी व्यक्त केली. तसेच अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांना काही सवाल केले आहेत.
छगन भुजबळ म्हणाले, की मला माझी भूमिका घ्यायला आणखी वेळ लागेल. त्यासाठीच मी सर्वांशी चर्चा करत आहे. तरुणांना मंत्रिमंडळात संधी द्यायची ही चांगली गोष्ट आहे. मात्र, तरुणांना संधी द्यायची यासाठी व्याख्या ठरवली गेली पाहिजे. त्यामध्ये किती वर्षांपर्यंत तरुण म्हणायचं? मग ६७ ते ६८ वर्षांपर्यंतही तरुण म्हणायचं का? हे ठरवलं पाहिजे.
हेही वाचा – पुण्याच्या वाघोलीमध्ये डंपरने ९ जणांना चिरडले, तीन जणांचा मृत्यू
मला अगोदर सांगितलं असतं की तुम्ही निवडणुकीत उभं राहू नका, मी राहिलो नसतो. पाच महिन्यांपूर्वी मला लोकसभेत पाठवत होते, तेव्हा माझी संपूर्ण तयारी झाली. मात्र, तेव्हाही मला थांबवावं लागलं. त्यानंतर राज्यसभेची निवडणूक आली तेव्हा म्हटलं मला राज्यसभेवर पाठवा. तेव्हा मला म्हणाले की, तुमची गरज राज्यात जास्त आहे. मग आता माझी गरज कमी झाली का? असं होतं तर मला निवडणूक लढवायला सांगायचं नव्हतं ना? आज माझ्या मतदारसंघात एक वेगळं वातावरण निर्माण झालं ते झालं नसतं. आता सर्व झाल्यानंतर मला सांगतात की राज्यसभेवर जा. मी आता राज्यसभेत जायचं याचा अर्थ मी विधानसभेचा राजीनामा द्यायचा. मग मी राजीनामा कसा देऊ? असं छगन भुजबळ म्हणाले.





