पुणेकरांना मेट्रो-बस प्रवास मोफत; राष्ट्रवादी काँग्रेसचा संयुक्त जाहीरनामा जाहीर

पुणे | पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीस अवघे पाच दिवस उरले असताना राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर आज पुण्यात शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. या जाहीरनाम्यातून पुणेकरांसाठी अनेक महत्त्वाची आश्वासने जाहीर करण्यात आली असून, मेट्रो आणि पीएमटी बस प्रवास मोफत देण्याची घोषणा सर्वाधिक लक्षवेधी ठरली आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करताना व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त जाहीरनाम्यात पुणेकरांसाठी अष्टसूत्री योजना जाहीर करण्यात आली. यामध्ये सर्वात महत्त्वाचे आश्वासन हे मोफत मेट्रो, मोफत बस प्रवास आहे. अजित पवार म्हणाले की, मोफत मेट्रो आणि बस प्रवास शक्य आहे का, हा प्रश्न पुणेकरांना पडू शकतो. मात्र मी तुम्हाला सांगतो, हे शक्य आहे. आम्ही तज्ज्ञांसोबत बोलून हे ठरवलेले आहे. पुणेकरांना आणि पिंपरी चिंचवडसाठी मोफत मेट्रो आणि बसचा प्रवास करुन दाखवतो, असे आश्वासन अजित पवारांनी दिले. ते म्हणाले, नळाद्वारे रोज स्वच्छ पाणी देण्याचे माझे आश्वासन आहे. जे शक्य आहे तेच मी बोलतो. पुणे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्ध्यांना मोफत टॅब देण्याचे आश्वासन राष्ट्रवादीने दिले. अजित पवार म्हणाले की, कोणत्याही शहरात सार्वजनिक वाहतूक सेवा ही कायम तोट्यात चालते. त्या तुलनेत मोफत प्रवासाचा खर्च फार जास्त नाही. त्यामुळे मोफत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था शक्य आहे. मोफत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुविधा निर्माण केली तर वाहतूक कोंडीतून पुणे, पिंपरी-चिंचवडकरांची मुक्तता होईल, असेही अजित पवार म्हणाले.
हेही वाचा : मतदानासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार
पुण्याला गतवैभव प्राप्त करुन द्यायचे आहे, त्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. सचिन खरात हे नाराज झाल्याने बाजूला गेले आहेत. आता सीताराम गंगावणे आमच्यासोबत आहेत ते जास्त जोमाने कामाला लागले आहेत, असेही अजित पवार म्हणाले. पुण्यामध्ये 150 मॉडेल शाळा उभारण्याचेही आश्वासन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त घोषणापत्रात देण्यात आले.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुण्याच्या पाच वर्षांच्या विकासाचा मुद्दा आमच्यासमोर आहे. मोफत प्रवास देणे शक्य आहे. कारण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या प्रशासनात त्रूटी आहेत, यातील त्रूटी दूर केल्या जातील. त्रूटी या स्थानिक ठिकाणी असल्याचा आरोप अजित पवारांनी केला. ठेके कोणाला द्यायचे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या त्रूटी यामुळे खर्च वाढत जातो, तो येथील स्थानिक प्रशासनाचा भाग आहे, तो निकाली काढण्याचे धोरण आमच्याकडे आहे, असे अजित पवार म्हणाले.





