खुनाचा गुन्हा चालला असता, पण विनयभंगाचा मान्य नाही ः आमदार जितेंद्र आव्हाड
![The crime of murder would have been prosecuted, but molestation is not acceptable: MLA Jitendra Awad](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/Jitendra-Awhad-2-768x470.png)
ठाणे । महाईन्यूज। विशेष प्रतिनिधी ।
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपच्या पदाधिकारी महिलेच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या गुन्ह्याबाबत खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे, यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा सोपवला आहे. यावेळी जयंत पाटील यांनी आव्हाडांना राजीनामा देऊ नये अशी समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र आव्हाड राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम राहिले. एकवेळ खुनाचा गुन्हा चालला असता, पण विनयभंगाचा मान्य नाही, म्हणत पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड काहीसे भावूक झाल्याचे दिसले.
आव्हाड म्हणाले की, माझ्यावर एकवेळ खुनाचा गुन्हा दाखल झाला तर चालला असता, पण विनयभंगाचा गुन्हा मान्य नाही. अशा आरोपांमुळे समाजात माझी मान खाली जात आहे. महाराष्ट्रात अतिशय खालच्या पातळीचं राजकारण सुरु आहे. त्यामुळे राजकारणात न राहिलेलं बरं आहे. एफआयआरमध्येही माझ्याविरोधात दाखल केलेले गुन्हे मला मान्य नाही, हा गुन्हा माझ्या विरोधातील षडयंत्रणाचा भाग आहे.
आव्हाड पुढे म्हणाले की, हर हर महादेव चित्रपटावरूनही माझ्यावर खोटे आरोप झाले. खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र त्याविरोधात मी लढण्यास सक्षम आहे. मी माझ्या भूमिकेवर अजूनही ठाम आहे. मात्र विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे मी कुणाविरोधातही लढू शकतो. ज्या महाराष्ट्रात परस्त्रीला मातेसमान मानतो, अशा महाराष्ट्रात असे आरोप होणे, माझ्यासाठी अतिशय मानहानीकारक आहे त्यामुळे मी हे सहन करू शकत नाही. असही आव्हाड म्हणाले.