फेसबुकच्या उपाध्यक्षांची आव्हान याचिका न्यायालयाने फेटाळली
- दिल्ली विधानसभा समितीकडून समन्स
नवी दिल्ली |
दिल्लीच्या ईशान्य भागात गेल्या वर्षी उसळलेल्या दंगलीसंदर्भात साक्षीदार म्हणून हजर राहण्यासाठी दिल्ली विधानसभेच्या शांतता आणि सलोखा समितीने फेसबुक इंडियाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांना हजर राहण्यास सांगितले होते, मात्र ते हजर न झाल्याने त्यांच्यावर समन्स बजावण्यात आले होते. त्याला आव्हान देणारी मोहन यांनी केलेली याचिका गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
विधानसभेच्या समितीसमोर त्यांच्याविरुद्ध काहीच घडलेले नाही, त्यामुळे मोहन यांची याचिका अकालिक आहे, असे न्या. संजय किशन कौल यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने म्हटले आहे. या समितीला समन्स बजावण्याचा वा समितीसमोर हजर न राहून याचिकाकर्त्यांना हक्कभंगासाठी जबाबदार धरण्याचा अधिकार नाही, असे मोहन, फेसबुक इंडिया ऑनलाइन सव्र्हिसेस प्रा. लि. व फेसबुकने याचिकेत म्हटले होते. समितीने गेल्या वर्षी १० व १८ सप्टेंबर रोजी नोटिसा बजावल्या होत्या. मोहन यांना फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत उसळलेल्या दंगलींबाबतच्या व द्वेषमूलक भाषणांचा प्रसार करण्यामागील फेसबुकच्या भूमिकेबाबत चौकशी करण्यासाठी समितीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले होते, त्याला याचिकाकर्त्यांनी आव्हान दिले होते.