बदलापूर प्रकरणावर तेजस्विनी पंडितची संतप्त पोस्ट, अभिनेत्री नेमकं काय म्हणाली?

Badlapur Case | बदलापुरातील शाळेत घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट पाहायला मिळत आहे. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी सर्व नागरिक रस्त्यावर उतरले. यावेळी पोलिसांमध्ये व नागरिकांमध्ये बाचाबाची झाली. परिस्थिती हाता बाहेर गेल्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज, अश्रूधुराचा वापर करावा लागला. या प्रकरणावर मराठी कलाकार देखील भडकले आहेत.
अभिनेत्री तेजस्विनी पंडितने इस्टाग्राम स्टोरीवर बदलापूर प्रकरणासंदर्भात पोस्ट लिहीली आहे. तीने लिहिलं आहे की, बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार करणाऱ्याला जातपात, धर्म नसतो…फक्त वृत्ती असते आणि तिच ठेचली पाहिजे. ज्यासाठी जाच बसणं गरजेचं आहे. नुसते कायदे कडक असून चालत नाही, ते आपल्याकडे आहेतच…अंमलात कधी आणायचे?..आणि सगळ्यांना एक मनापासून विनंती, कृपया बलात्कारासारख्या घृणास्पद कृत्याचं कुठल्याही पद्धतीने राजकारण करू नये. #निषेध #lawandordernotinplace.
हेही वाचा – ‘देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राकडे पाहण्यासाठी वेळ नाही’; जयंत पाटलांची टीका
तसंच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील सोशल मीडियाद्वारे बदलापूर प्रकरणाचा निषेध नोंदवला आहे. सोनालीने लिहिलं आहे, “पुरे झालं आता, आता वेळ आली आहे…’बदला’ ‘पूर’”. दरम्यान, बदलापूर प्रकरणावर अभिनेता रितेश देशमुख, प्रसाद ओक, शिवाली परब, प्रिया बापट, सुरभी भावे, रसिका सुनिल, अभिजीत केळकर, किरण माने, अक्षय केळकर, मृण्मयी देशपांडे अशा अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर लिहित निषेध नोंदवला आहे.





