जिल्हाध्यक्षांकडून दोन चापट्या मारल्याचा दावा, सुषमा अंधारे म्हणाल्या..
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली होती. आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारेंवर गंभीर आरोप केले होते. एवढच नव्हे तर सुषमा अंधारेंच्या दोन कानशिलात ठेवून दिल्याचंही ते म्हणाले होते. त्यांच्या या दाव्यामुळे ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, यावरून सुषमा अंधारेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, महाप्रबोधन यात्रा २० मे रोजी होणार आहे. ही सभा ग्रामीण भागातील समारोपीय सभा आहे. आतापर्यंत जेवढ्या महाप्रबोधन सभा झाल्या त्या सर्व वादळी झाल्या. महाप्रबोधन यात्रा म्हटलं की चर्चा, वाद हे आलेच. विशेष म्हणजे या समारोप सभेला संजय राऊत असणार आहेत. म्हणजे पहिल्यांदाच महाप्रबोधन सभेला मी आणि संजय राऊत एकत्र असणार आहोत. त्यामुळे बऱ्याच लोकांना अस्वस्थ वाटणं स्वाभाविक आहे. बीडमध्ये बरेच वर्षे शिवसेनेची पडझड होत आहे. आता नव्याने शिवसेना उसळी मारत आहे.
हेही वाचा – ‘शिवसेनेचा ४० पैकी एकही आमदार निवडून येणार नाही’; जयंत पाटील
काल आम्ही स्टेजची पाहणी करायला गेलो होतो. स्टेजची पाहणी झाली आणि त्यानंतर आम्ही परत आलो. त्यानंतर आप्पासाहेब जाधव काही गोष्टींवर बोलले. ते बऱ्यापैकी नाराज होते. या नाराजीचं कारण बॅनरवर फोटो नाही असं होतं. यावर मी त्यांना आपण बोलू असं सांगितलं. आमचे दुसरे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी इथं बोलायला नको, हॉटेलवर जाऊन बोलू असं सांगितलं. त्यानंतर मी ठीक म्हणून गाडीत बसले. गाडीत मी फेसबूक लाईव्ह करून सभेच्या तयारीची माहिती देत होते. त्याचवेळी त्यांनी एका मुलाला काही कामं सांगितली. तेव्हा त्या मुलाने मी मजूर नाही, नीट बोला असं सांगितलं. यानंतर मी जिल्हाप्रमुख आहे, माझ्याशी असं बोलतो का, असशील तू जहागिरदार असं म्हणत शाब्दिक बाचाबाची वाढत गेली. त्याचं भांडणात रुपांतर झालं आणि मारामारी झाली, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
सुषमाताई अंधारे सध्या जिल्ह्यामध्ये खूप दादागिरी करत आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांकडून त्या पैसे मागत आहेत. आपल्या कार्यालयात एसी, फर्निचर आणि सोफा बसवण्यासाठी त्या पदाधिकाऱ्यांकडून पैसे घेत आहेत. त्या माझंही पद विकत आहेत. मी पक्ष वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहे. रक्तांचं पाणी करत आहे. माझ्या लेकरा-बाळाच्या मुखातील पैसे खर्च करून मी पक्ष वाढवत आहे. याकडे सुषमा अंधारेंचं लक्ष नाही. त्यामुळे सुषमा अंधारेंचा आणि माझा वाद झाला. या वादात मी सुषमा अंधारेंना दोन चापट्या लगावल्या, असे गंभीर आरोप आप्पासाहेब जाधव यांनी केला आहे.