स्वतःच्या वडिलांना कुणी घराबाहेर काढतं का? सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना सवाल
![Supriya Sule said that someone throws his own father out of the house](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Ajit-Pawar-and-Supriya-Sule-780x470.jpg)
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवारांना दिलं आहे. तर शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव मिळालं आहे. यावरून शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाला आहे. स्वत:च्या वडिलांना कुणी घराबाहेर काढतं का? असा टोला खासदार सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांना लगावला आहे.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांनी स्थापन केला. तो पक्ष घेतला. तसंच उद्धव ठाकरेंच्या वडिलांनी स्थापन केलेला पक्षही काढून घेतला. स्वत:च्या वडिलांना कुणी घराबाहेर काढतं का? असं त्या म्हणाल्या.
हेही वाचा – ‘योगी आदित्यनाथ यांचा अभ्यास कमी’; अजित पवार गटाची टीका
श्रीराम त्यांच्या वडिलांच्या वचनासाठी १४ वर्षांच्या वनवासाला गेले. आपल्यावर हे मर्यादा पुरुषोत्तम रामाचे संस्कार आहेत. आज ते आपला पक्षही घेऊन गेले आणि चिन्हही घेऊन गेले. आता लोक विचारतात नवं चिन्ह कसं पोहचवणार? चिन्ह आपण पोहचवू काळजी करु नका. आपण नव्याने पक्ष उभा करु, नवीन चिन्ह घेऊन नव्या जोमाने उभे राहू. आमची सगळ्यात मोठी ताकद इमानदारी आहे. ते सगळं घेऊन जातील पण इमानदारी कशी काय नेतील? असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
ट्रिपल इंजिन सरकारने कुठली मर्यादा आज ठेवली आहे? महिलांवरचे अत्याचार, गोळीबार या घटना राजरोसपणे घडत आहेत. गुंडराज महाराष्ट्रात आहे पण आम्ही याविरोधात लढा देत आहोत. महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींमध्ये असंवेदनशीलपणा आलेला आहे. सरकार बदलणं हाच या सगळ्यावरचा उपाय आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.