Breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

सुप्रिया सुळेंना आझाद मैदानावर घेरताच सुषमा अंधारेंची पोस्ट!

शरद पवार यांनी मराठ्यांचं वाटोळं केलं : सुषमा अंधारें

मुंबई : मनोज जरांगे यांचे आझाद मैदानात आमरण उपोषण चालू आहे. सरसकट मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळायला हवे, अशी त्यांची मागणी आहे. जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अनेक आमदार, खासदार आंदोलनस्थळी भेट देऊन येत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनीही जरांगे यांची मंचावर जाऊन भेट घेतली. मात्र परतताना त्यांना मराठा आंदोलकांनी प्रचंड विरोध केला. त्या करारमध्ये बसताना खासदार शरद पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच सुप्रिया सुळे यांच्या कारलाही आंदोलकांनी घेराव घातला. दरम्यान, या घटनेचे काही व्हिडीओ आता समोर आले असून ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सुप्रिया सुळे, शरद पवारांची बाजू घेणार पोस्ट केली आहे. शरद पवार यांनी मराठ्यांचं वाटोळं केलं, म्हणणाऱ्यांना अंधारे यांनी चांगलीच चपराक लगावली आहे.

मी पवारांची अनेक वर्ष टीकाकार राहिले आहे, मात्र…
अंधारे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये अंधारे यांनी शरद पवार यांनी मराठा समाजासाठी काय-काय केलं याची सविस्तर माहिती दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे मराठा आंदोलकांना भेटण्यासाठी गेलेल्या असताना काही लोकांनी त्यांना घेराव घातल्याची बातमी मोठी करून दाखवली जात आहे. ब्रेकिंग न्यूज च्या नावाखाली “पवारांनी मराठ्यांचं वाटोळ केलं” अशी ही एक बातमी दाखवली जात आहे. खरंतर मी पवारांची अनेक वर्ष टीकाकार राहिले आहे. मात्र पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं हे काही पटण्यासारखं नाही, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय.

महाराष्ट्रात संस्थात्मक काम उभे करण्यामध्ये पवारांचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. सहकार क्षेत्राचं जाळं पवारामुळेच महाराष्ट्रात गाव-खेड्यापर्यंत पोहोचू शकलं. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दिसणाऱ्या मराठा समुदायाच्या शिक्षण संस्था, साखर कारखाने, ऑइल मिल, डाळ मिल, पेपर मिल, दूध डेअरी हे उभं करण्यात नक्कीच पवारांचे योगदान आहे. आजघडीला भाजपाने ज्या अनेक नेत्यांना मांडीवर घेतले आहे हे नेते सुद्धा पवारांनीच उभे केले आहेत, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.

हेही वाचा      :          मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू

पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून…
एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर झिरोवर आणून भाजपासोबत सत्तेत बसलेले अजित पवार हे शरद पवारांनीच घडवलेले आहेत. अजित पवारांना राजकारणात तयार करणे म्हणजे मराठ्यांचं वाटोळं करणं असं असेल तर मग अजित पवारांच्या सत्तास्थानी असल्याचे लाभ घेणारे सगळे कोण आहेत ते एकदा शोधले पाहिजे,अशी टीका सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. मराठा आरक्षणाची मागणी पवारांच्या ऐन उमेदीच्या काळात कधीही झाली नाही. या मागणीने जोर धरला तो साधारण 1992 सालानंतर. पण तोपर्यंत पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी नावाचा नवा पक्ष स्थापन केला होता, अशी इतिहासही अंधारे यांनी सांगितला.

पण तेव्हा आर्थिक निकषावर आरक्षण…
पवारांनी स्थापन केलेल्या या पक्षाची केंद्रात कधीही सत्ता आली नाही. इतरांच्या मदतीने केंद्रात, सत्तेत एखादे पद नक्की मिळालेलं असेल. मात्र संपूर्ण पक्षाची अशी सत्ता केंद्रात कधीही मिळाली नाही. 1995 ते 2005 या काळामध्ये विविध मराठा संघटनांच्या आरक्षणांवर चर्चा आणि बैठका जेव्हा सुरू झाल्या, विशेषतः संभाजीनगर येथे क्रांती सेनेच्या शालिनी पाटील मराठा संग्रामचे विनायक मेटे, छावाचे अण्णा जावळे किंवा अनेक संघटना जेव्हा एकत्र आल्या तेव्हा त्या मंचावर शरद पवारही होते. पण तेव्हा आर्थिक निकषावर आरक्षण मिळाले पाहिजे याची चर्चा सुरू झाली होती, असाही संदर्भ सुषमा अंधारे यांनी दिला.

आपल्याला भूक लागली तर…
आरक्षणाची जी आजची मागणी आहे ती ओबीसीतून आरक्षण मिळाले पाहिजे अशी आहे. ही मागणी एका तांत्रिक पेचात अडकलेली आहे. 50 टक्के पेक्षा आरक्षणाची मर्यादा वाढवता येत नाही. हा माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. यात फेरबदल करण्याची क्षमता जर कुणाची असेल तर ती फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयाशी समक्ष असणारी दुसरी संस्था म्हणजे संसदेची. संसदेत सत्ता पवारांची नाही तर ती भाजपाची आहे. मग तरीसुद्धा सुप्रिया सुळेंना घेराव का घातला जावा? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच याचं उत्तर सोपं आहे. आपल्याला भूक लागली तर आपण शेजाऱ्यावर चिडचिड करत नाही आपल्या घरातल्या आई किंवा बाबाकडे हक्काने मागतो.

गेल्या तीन दिवसांपासून मराठ्यांची अन्नपाण्याची रसद फडणवीस यांनी तोडली. आझाद मैदानावरची वीज बंद ठेवली. तरीही मराठे लढत आहेत. अशावेळी आपल्या संयमाचा बांध फुटला तर आपली सगळी भडास निश्चितच आपल्याच माणसांवर निघेल. संसदेत आरक्षणाच्या प्रश्नावर वारंवार भूमिका मांडणाऱ्या सुप्रिया सुळे या अर्थाने जर त्यांना आपली हक्काची बहीण वाटत असेल तर हे अत्यंत सकारात्मक आहे, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली.

भावंडांची विचारपूस करण्यासाठी सुप्रिया सुळे…
राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस असतानासुद्धा सत्तास्थानी नसणाऱ्या 85 वर्षाच्या पवारांनी आपले प्रश्न सोडवावेत ही अपेक्षा जर पवारांकडूनच केली जात असेल तर याचा अर्थ फडणवीस यांचा नाकर्तेपणा अधिक सिद्ध करणारी आणि 85 व्या वर्षीसुद्धा पवारांकडून अपेक्षा सकारात्मकता दाखवणारी आहे. खरंतर या आंदोलनस्थळी सत्तेत असलेले एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी जायला हवे. मात्र या आंदोलकांच्या समोर निधड्या छातीने जाण्याची हिंमत सरकारमध्ये नाही. अशावेळी आपल्या भावंडांची विचारपूस करण्यासाठी सुप्रिया सुळे तिथे पोचत असतील तर हे स्वागतार्ह आहे, असे मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button