पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंना देवेंद्र फडणवीस यांची खास विनंती; म्हणाले..
Devendra Fadnavis : शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने आज बीडमधल्या परळीत शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. मुंडे भाऊ-बहिणीतील राजकीय दरीमुळे हा कार्यक्रम आधीच चर्चेत आला होता. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना एक महत्वाची विनंती केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज मराठवाडा संकटात आहे. बीड जिल्हाही संकटात आहे. मोठ्या प्रमाणात दुष्काळाची छाया आहे. अनेक तालुक्यांमध्ये पाऊस कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे. मात्र मला एका गोष्टीचं समाधान आहे की आपण निर्णय केला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात एक रूपयात पिक वीमा योजना जाहीर केली. या जिल्ह्यात १८ लाख शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम त्यांच्या खात्यात मिळाली. हा वीमा सर्वांना मिळाला पाहिजे यासाठी धनंजय मुंडेंनी प्रयत्न केले. तसंच दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना एकनाथ शिंदे सरकार पूर्णपणे मदत करेल. कुठल्याही शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही.
पंकजा मुंडे यांनी माझी लेक भाग्यश्री योजना सुरु केली होती. त्याचा पुढचा टप्पा आपण सुरु केला आहे. ज्या घरात मुलगी जन्माला येईल ते घर लखपती करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. आमच्या माता-भगिनींनी आणखी एका निर्णयाचं स्वागत केलं आहे. ५० टक्के तिकिट दरांमध्ये एसटीचा प्रवास सुरु केला आहे. आता तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं असेल तर तुम्ही सांगू शकता तुम्ही घरी बसा मी जाऊन येते कारण मी जाऊन आले तर एसटीला अर्धच तिकिट लागतं. असं म्हणत या योजनेची आठवणही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात करुन दिली.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची जंबो कार्यकारिणी जाहीर!
आम्ही तिघं एकत्र आलो आहोत. आमच्या मनात एकच ध्यास आहे तो म्हणजे महाराष्ट्राचा विकास. काही लोकांना ते नको आहे त्यामुळे काही जण रोज बेताल वक्तव्य करतात. त्याकडे आम्ही लक्षही देत नाही. आम्ही ज्या राज्यांमध्ये प्रचाराला गेलो तिथे चांगला विजय मिळाला. त्याचीही पोटदुखी काही लोकांना आहे. ते विचारतात तुम्ही शेजारच्या राज्यात का गेले? तुम्हाला शेजारच्या घरात कुणी बोलवत नाही आम्हाला राज्यात बोलवतात. पुढच्या वेळी तर अजित पवारांनाही घेऊन जाणार आहोत. तरीही आमचं लक्ष महाराष्ट्राकडेच आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मगाशी पंकजा मुंडे म्हणाल्या की आज या स्टेजवर पंकजा मुंडे आहेत आणि धनंजय मुंडेही आहेत. मी दोघांना एकच विनंती करेन तुम्ही दोघे असेच एका स्टेजवर राहा. यांना आज सांगू इच्छितो की तुम्ही दोघंही एकत्र राहा. आमच्या तिघांची ताकद तुमच्या पाठिशी अशी उभी करु की परळी किंवा बीड असेल काहीही पाहायची आवश्यकता नाही. तुम्ही एकत्र राहिलात तर परळी आणि बीडचं कल्याण होईल तसंच महाराष्ट्राचंही कल्याण होईल, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.