धक्कादायक! रखडलेल्या पुलाच्या कामामुळे चौघांचा अपघाती मृत्यू, शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा
हिंगोली |
सेनगाव मार्गावरील रखडलेल्या पुलाच्या कामामुळे पाणी साचलेल्या खड्ड्यात मोटार कोसळून रविवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात लोणार तालुक्यातील चौघांचा बळी गेला. दरम्यान, प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे नाहक चौघांचा बळी गेला असून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह स्वीकारण्यात येणार नाही, असा पवित्रा मृतांच्या नातेवाइकांनी घेतल्यानंतर अखेर या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात बांधकामाचे कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध सोमवारी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिंतूर-सेनगाव-गोरेगाव मार्गावरील अनेक पुलांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. काही कामांची गती अत्यंत संथ आहे. यातच नीटची तयारी करणाऱ्या मुलीचे शुल्क भरण्यासाठी नांदेडला गेलेल्या चौघांचा परतताना सेनगावजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. या अपघातात लोणार तालुक्यातील शिक्षक गजानन अंकुश सानप, विजय परसराम ठाकरे, त्र्यंबक संजाबराव थोरवे आणि प्रकाश साहेबराव सोनुने या चौघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सोमवारी मृतांचे नातेवाईक घटनास्थळी जमले होते. संबंधित पुलाच्या रखडलेल्या कामामुळे आमच्या नातेवाइकांचा मृत्यू झाला.
अपघाताला संबंधित काम करणारी एजन्सी कारणीभूत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची आक्रमक भूमिका नातेवाइकांनी घेतली होती. रस्त्याच्या कामाचे ढिसाळ नियोजन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे हा भीषण अपघात होऊन चार जणांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. यानंतर कंत्राटदार व सा. बां. विभागातील संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, रस्ते, पुलाच्या अर्धवट कामांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून त्याचा फटका मंगळवारी कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत रेडकर यांनाही सहन करावा लागला. खेडकर यांना बराच वेळ ताटकळावे लागले. हिंगोली कळमनुरी राष्ट्रीय महामार्गावर वसई पांग्रा परिसरातील पुलाचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे वाहतुकीलाही अडचण निर्माण होत आहे. कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांना वाहतूक सुरळीत करावी लागली.