बिहारमध्ये ‘इंडिया’ला धक्का : ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी; भाजपा महायुतीतर्फे सत्ता स्थापनेची तयारी!
नितीशकुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा दिला राजीनामा ; भाजपसोबत जाण्याचा घेतला निर्णय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/WhatsApp-Image-2024-01-28-at-1.07.24-PM-780x470.jpeg)
नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. नितीश कुमार यांनी आरजेडीची साथ सोडून भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला असून यामुळे बिहारमध्ये पुन्हा सत्ताबदल होत आहे.
नितीश कुमार यांनी रविवारी सकाळी ११ वाजता राजभवनात जाऊन राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. आज संध्याकाळी नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.या सरकारमध्ये भारतीय जनता पक्षही आणि एनडीएमधील इतर पक्ष असणार आहे.
काही वेळात भाजपचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचतील. त्यानंतर आजच नितीश कुमार नवीन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. दरम्यान भाजप आमदारांची बैठक झाली. या बैठकीत नितीशकुमार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाला.
हेही वाचा – ‘ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना, सरकारकडून हट्ट पुरवण्याचं काम सुरु’; छगन भुजबळांची नाराजी
यासंबंधित पत्रावर आमदारांच्या सह्या घेतल्या जात आहेत. त्यानंतर भाजप आमदार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहचणार आहे. या ठिकाणी एनडीएच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत नितीश कुमार यांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड होणार आहे.
नितीश कुमार आज नवव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तसेच गेल्या पाच वर्षांत तिसऱ्यांदा ते शपथ घेणार आहेत. वेळी नितीश कुमार यांच्यासह भाजपचे सुशील मोदी आणि रेणू देवी हे दोन नेते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.