संजय राऊतांना ‘ते’ विधान भोवणार; शिवसेनेची गुन्हा दाखल करण्याची मागणी
मुंबई : खारघर दुर्घटनेत ५० जणांचा मृत्यू झाला, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. राऊतांचे हे विधान आता त्यांना चांगलेच भोवणार आहे. कारण राऊतांच्या या वक्तव्याविरोधात शिवसेनेने मरिन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट, भरत गोगावले, किरण पावसकर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बागुल यांच्याकडे तक्रार केली आहे. संजय राऊतांचं हे वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणारं असल्याचा आरोप शिवसेनेने यामध्ये केला आहे.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या घटनेवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्याचीही मागणी संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. खारघरमधील दुर्घटनेविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का आहेत? त्यांना मन आहे की नाही, असे प्रश्न राऊतांनी उपस्थित केले आहेत.