शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदारांची धुसफूस चव्हाट्यावर, गुवाहाटीवरून पेटला वाद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/Eknath-Shinde-Fadanvis.png)
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयामुळे सर्व काही सुरळीत सुरु असेल तर वाटलं होतं. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अलबेल असल्याचं दिसून आलं आहे. सरकारमधील आमदारांची धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहेत. गुवाहाटीवरुन झालेल्या आरोपांमुळे आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. बच्चू कडू यांनी आमदार रवी राणांविरुद्ध थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
गुवाहाटीला जाऊन करोडो रुपये लाटले असा आरोप रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केला होता. या आरोपांवरुनच बच्चू कडू यांनी पोलिसांत तक्रार दाखल करत रवी राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. रवी राणा यांनी माझी बदनामी केली आहे. 20-20 वर्ष आमची राजकीय करिअर उभं करायला गेली. मी पैसे घेऊन जर गुवाहाटीला गेलो असेल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच याचे उत्तर दिले पाहिजे, असं बच्चू कडू म्हणाले.
या संदर्भात मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील नोटीस पाठवणार आहे. तुम्ही पैसे दिले असेल तर स्पष्ट करा, अशी मागणी या नोटीसद्वारे करणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले.
राणा यांनी पैसे घेतल्याचे पुरावे दिले तर त्यांच्या घरी भांडी घासेन असे देखील बच्चू कडू म्हणाले. दरम्यान, या दोघांच्या भांडणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यस्थी करणार असल्याचं सांगितलं जात आहे.