दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? शरद पवारांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण

Sharad Pawar | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन महत्त्वाच्या चर्चांनी जोर धरला आहे. एकीकडे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवर चर्चा सुरू असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये – शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस – पुन्हा एकत्र येण्याबाबत अंदाज बांधले जात आहेत. या पार्श्वभूमीवर, शरद पवार यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत आपलं काय मत आहे? अशी विचारणा केली असता शरद पवार म्हणाले, की आमचं म्हणाल तर आमच्या पक्षात दोन प्रकारचे मतप्रवाह आहेत. त्यातला एक मतप्रवाह सांगतो की आम्ही (अजित पवार गट व शरद पवार गट) पुन्हा एकत्र यायला हवं. तर दुसरा गट सांगतो की कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या भारतीय जनता पक्षाबरोबर जाता कामा नये. इंडिया आघाडीसोबत राहून विरोधकांची मोट पुन्हा एकदा बांधण्याचं मत या गटाचं आहे, असं शरद पवार म्हणाले.
हेही वाचा : PCMC | नवीन पाणी पुरवठा कनेक्शनसाठी पुढील दोन महिने स्थगिती
इंडिया आघाडीच्या सध्याच्या अवस्थेबाबतही शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. आम्हाला पुन्हा एकदा विरोधकांना एकत्र करावं लागेल, आमच्या पक्षाची पुनर्बांधणी करावी लागेल, तरुणांना पक्षात सामील करून घ्यावं लागेल आणि त्यानंतर एकत्र मिळून काम करावं लागेल, असं शरद पवार म्हणाले. तसेच, आमचा विचार हा विरोधी पक्षात काम करण्याचा आहे. भारतीय जनता पक्षाला सक्षम असा पर्याय तयार करावा लागेल, असंही शरद पवार म्हणाले.