शरद पवार यांचा अजित पवार गटावर हल्लाबोल; म्हणाले..
![Sharad Pawar said that the Ajit Pawar group has joined the BJP because of the fear of ED action](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Sharad-Pawar-1-780x470.jpg)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीतील कार्यकारिणीच्या बैठकीत अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अजित पवार गट हा ईडीच्या कारवाईच्या भीतीमुळे भाजपसोबत गेलाय, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले, अजित पवार गटाची अध्यक्ष पदाची निवड चुकीची आहे. निवडणुकीची पद्धत कशी असावी हे मी त्यांना सांगितलं. जे आज म्हणतात की ही निवडणूक योग्य नव्हती. मात्र यावर त्यांच्या सह्या आहेत. आम्ही एकत्र बसलो, चर्चा केली. जे लोक गेलेत ते म्हणतात की पक्ष आम्हाला मिळेल, चिन्हा मिळेल. जे अजून व्हायचे आहे ते कसं सांगतात की हा निर्णय आमच्या बाजूने लागेल? मला कळत नाही हे असं कसं असू शकतं?
जे लोक सोडून गेलेत त्यांच्या बोलण्याला काय आधार आहे? चिंता करण्याची गरज नाही. यापूर्वी काँग्रेसचीदेखील चिन्ह बदलली होती. काँग्रेस चे दोन भाग झाले होते. काँग्रेस आय आणि काँग्रेस ओ. निवडणूक चिन्ह हा महत्त्वाचा आधार आहे. चिन्ह गेलं तरी लोक बदलत नाहीत. मी पहिली निवडणूक लढलो. मी उमेदवार होतो. चिन्ह बैलजोडी होतं. त्यावर मी लढलो, निवडून आलो, असं शरद पवार म्हणाले.
हेही वाचा – ‘भाजपा मित्र पक्ष म्हणून जवळ घेतो, नंतर अफजल खानासारखी मिठी मारतो’; बच्चू कडू यांची टीका
३ वर्ष संघर्ष झाला. निवडणूक आयोगानं चिन्ह चरखा दिलं. तरीही मी जिंकलो. आणीबाणी आली. इंदिरा गांधींच्या विरोधात वातावरण होतं. या निवडणुकीत हरल्या. त्यानंतर परत चिन्ह बदललं. गाय वासरू आलं. चौथं हात, पाचवं चिन्ह घड्याळ आलं. चिन्ह बदलण्याचा प्रयत्न होवू शकतो. मात्र चिंता करण्याची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वे उद्घाटन करायला जातात आणि त्यांची रेल्वे ही विरोधी पक्षावर सुरु होते. भोपाळला गेल्यावर भाषण दिलं की राष्टवादी पार्टी भ्रष्ट आहे. जर पार्टी भ्रष्ट आहे तर चौकशी करा आणि जर खरं असेल तर कारवाई करा. मात्र ज्यांच्याविरोधात आरोप केला ते आज राज्य मंत्रिमंडळात आहेत, असं शरद पवार म्हणाले.
८ लोकांना मंत्रिमंडळात सहभागी केलं. हे लोक मला भेटयाला आले होते. आमच्या विरोधात ईडीची कारवाई होतेय. यातून काही मार्ग काढा. तुम्ही आला नाहीत तर ईडी येईल, अशी विनंती केली. काही इमानदार कार्यकर्ते होते. त्यापैकी एक अनिल देशमुख. त्यांनी पक्ष सोडला नाही, असंही शरद पवार म्हणाले.