‘आमची आघाडी हाच आमचा चेहरा’; मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर शरद पवारांची भूमिका
![Sharad Pawar said that our front is our face](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Sharad-Pawar-4-780x470.jpg)
मुंबई | शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याविषयी भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकांना सामोरं जाणं हा धोका आहे. महाराष्ट्रानं उद्धव ठाकरेंचं काम पाहिलं आहे. लोकसभेतलं मतदान उद्धव ठाकरेंकडे पाहूनही झालं आहे. अर्थात, तिघांची ताकग एकत्र होती. पण बिनचेहऱ्याची आघाडी ही अजिबात चालणार नाही, असं ते म्हणाले. याबाबत शरद पवारांना विचारलं असता त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.
शरद पवार म्हणाले, आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा. एखादी व्यक्ती आमचा चेहरा नाही. सामुहिक नेतृत्व हे आमचं सूत्र आहे. आमची काही निवडणुकीवर अजून चर्चा झालेली नाही. आम्ही असं ठरवलंय की आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील पक्ष असे आम्ही तिघे मिळून निर्णय घेणार आहोत. माझी त्या बैठकीत अशी सूचना असेल की लोकसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष, डावे कम्युनिस्ट, उजवे कम्युनिस्ट, आप या लोकांनी आम्हाला मदत केली. जरी आघाडीत सध्या आम्ही तिघंच असणार असलो, तरी डाव्या विचारसणीचे जे घटक आहेत आणि जे मोदींच्या विरोधात आहेत त्यांनाही सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमची चर्चा झाल्यानंतर जागांचं वाटप झालं की सगळे पक्ष त्यांच्या सहकाऱ्यांना-संघटनेला विश्वासात घेऊन निर्णय घेतील.
हेही वाचा – साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूलला फिडे बुद्धिबळ शाळा सुवर्ण पुरस्कार प्रदान
अजित पवार गटातले आमदार परत आल्यास काय भूमिका असेल? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले. त्याविषयी जयंत पाटील आणि इतर लोकांना माहिती असेल ते. माझी काही कुणाशी प्रत्यक्ष भेट झालेली नाही. कोण येतं ते बघूयात. प्रस्ताव तरी येऊ द्या. किमान माझ्याकडे तरी प्रस्ताव आलेला नाही, असंही शरद पवार म्हणाले.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकांना सामोरं जाणं हा धोका आहे. महाराष्ट्रानं उद्धव ठाकरेंचं काम पाहिलं आहे. लोकसभेतलं मतदान उद्धव ठाकरेंकडे पाहूनही झालं आहे. अर्थात, तिघांची ताकग एकत्र होती. पण बिनचेहऱ्याची आघाडी ही अजिबात चालणार नाही. केंद्रात राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर झाले असते तर किमान २५ ते ३० जागा वाढल्या असत्या. कोणतंही सरकार किंवा कोणतीही संस्था बिनचेहऱ्याची असू नये. आपण कुणासाठी मतदान करतोय हे लोकांना कळायला हवं. लोकांनी इंदिरा गांधींना, मोदींना मतदान केलं. चेहरा कोण, यावर आमच्यात मतभेद नाहीयेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात एकत्र लढणार आहोत. १७५ ते १८० जागा जिंकू, असं संजय राऊत म्हणाले.