पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ विधानावर शरद पवारांची तीव्र नापसंती; म्हणाले..
![Sharad Pawar said that it was painful for us to make such a statement by the Prime Minister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Narendra-Modi-and-Sharad-Pawar-780x470.jpg)
मुंबई : संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक दोन्ही सभागृहात मांडलं. हे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झालं. मात्र, यावरून आता राजकीय श्रेयवाद सुरू झाल्याचं दिसत आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
शरद पवार म्हणाले, संसदेत महिलांच्या आरक्षणासंदर्भातला निर्णय एकमताने घेतला, त्याबाबत ४५४ सदस्य अनुकूल होते. कुणीही विरोध केला नाही. पण त्यात एक सूचना अशी होती की हा घटनात्मक दुरुस्तीचा निर्णय घेत असताना त्यात एससी, एसटी महिलांना जशी संधी आहे, तशीच ओबीसींनाही संधी दिली जावी. शेवटी एकमताने निर्णय व्हावा, यासाठी त्याला सर्वांनी पाठिंबा दिला.
ही पार्श्वभूमी असताना पंतप्रधानांनी असं वक्तव्य करणं आम्हाला क्लेशदायक होतं. ते म्हणाले की काँग्रेस व इतर काही लोकांनी नाईलाजाने या विधेयकाला पाठिंबा दिला. पण ती वस्तुस्थिती नाही. ते म्हणाले की, इतक्या वर्षांत इतरांना याबाबतीत काही करता आलं नाही. इतरांनी याचा विचारही केला नाही. १९९३ साली माझ्याकडे महाराष्ट्राची सूत्रं होती. देशात राज्य महिला आयोग स्थापन करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं.मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात स्वतंत्र महिला विभाग सुरू केला. तो इतर कुठेही नव्हता, असं शरद पवार म्हणाले.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमधील सोसायटीधारकांच्या तक्रारींसाठी ‘सारथी’वर स्वतंत्र ‘‘ऍक्सिस’’
१९९३ साली ७३वी घटनादुरुस्ती झाली, त्या दुरुस्तीची अंमलबजावणी सुरू झाली आणि त्यात देशभरात पंचायत व्यवस्था लागू झाली. त्यानुसार महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकतृतियांश आरक्षण देण्याची तरतूद केली गेली. त्यानुसार नगरपालिका, नगरपरिषदा, महानगरपालिका यासाठी घटनादुरुस्तीचा कायदा पारित झाला व महिलांना आरक्षण लागू झालं. १९९४ मध्ये महाराष्ट्रानं देशात पहिलं महिला धोरण जाहीर केलं. या धोरणातूनच महाराष्ट्रात सरकारी, निमसरकारी महिलांसाठी ३ टक्के आरक्षण ठेवण्यात आलं. नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्क्यांचा निर्णय घेतला गेला. असं करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य होतं. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना महिलांबाबत हे निर्णय घेतले. त्यामुळे पंतप्रधान जे सांगतात की याबाबत कुणी विचारही केला नाही, ते वास्तव नाही, असं शरद पवार म्हणाले.
दिल्लीच्या पथसंचलनाचं नेतृत्व एक महिला करते हे आपण आता पाहातो. वायुदलात महिलांना सहभागी करून घेतलेलं आहे. तेव्हा तिन्ही दलांच्या तीन बैठका झाल्या. या बैठकांमध्ये मी तिन्ही दलांच्या प्रमुखांना ११ टक्के महिला आरक्षणासाठी तयार करू शकलो नाही. पण चौथ्या वेळी मी त्यांना सांगितलं की निर्णय घेण्याचा अधिकार माझा आहे. त्यामुळे ११ टक्के आरक्षणाचा निर्णय मी घेतला आहे. तेव्हा हे आरक्षण लागू झालं. काँग्रेस सरकारच्या काळात हे निर्णय घेतले गेलेत. दुर्दैवाने पंतप्रधानांना यासंदर्भात कुणी माहिती दिली नसावी. त्यामुळेच त्यांनी अशा प्रकारचे उद्गार काढले, असंही शरद पवार म्हणाले.