..तर आम्ही एमआयएमलाही पाठिंबा देऊ; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांचं वक्तव्य चर्चेत

Swami Avimukteshwaranand Saraswati | शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे त्यांच्या वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. पुन्हा एकदा त्यांचं असंच एक विधान समोर आलं आहे. शिवहरमध्ये शंकराचार्य स्वामी अविममुक्तेश्वरानंद म्हणाले गोरक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या कोणत्याही पक्षाला किंवा संघटनेला, अगदी एआयएमआयएमलाही पाठिंबा देऊ. शंकराचार्यांच्या या वक्तव्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शंकराचार्य म्हणाले, गोमाता कुठल्याही जात, पंथ, पक्षाची नाही. गोमाता ही संपूर्ण भारताची ओळख आहे. जे लोक हिंदू आणि हिंदुत्वाच्या नावावर मतं मागतात ते त्यांच्या जाहीरनाम्यांमध्ये गो रक्षेचा मुद्दा का उपस्थित करत नाहीत? गो रक्षा करण्यात काय अडचण आहे? गोमातेचं नाव घेऊन राजकारण केलं जातं पण गोमातेच्या सेवेसाठी तुम्ही काय करत आहेत हे देशाला जाणून घ्यायचं आहे.
हेही वाचा : ‘ठाणे, कोपर रेल्वे स्थानकाला बुलेट ट्रेन स्थानकाशी जोडणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आमची निष्ठा कुठल्याही राजकीय पक्षाशी नाही. आमची निष्ठा गोमाता आणि सनातन धर्माशी आहे. आम्ही कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही किंवा कुणाच्या बाजूनेही नाही. गोरक्षणाचा मुद्दा जो मांडेल त्या पक्षाला आम्ही पाठिंबा देऊ. उद्या एमआयएमने हा मुद्दा आणला तर त्यांनाही प्रसंगी पाठिंबा देऊ. गोमाता भारतीय संस्कृती, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण यांचा आधारस्तंभ आहे असंही शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं आहे.





