‘अजित पवारांच्या मनात काय हे ४ दिवसांत कळेल’; शिंदे गटातील आमदाराचा मोठा दावा
गर्दी होते मग मतदान का मिळत नाही?
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री पदावर दावा केला आहे. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, याचवेळी शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मुंबईत होणाऱ्या वज्रमुठ सभेवर प्रतिक्रिया देताना अजित पवारांबद्दल मोठा दावा केला आहे.
आज मुंबईत होणाऱ्या वज्रमूठ सभेवरून देखील शिरसाट यांनी महाविकास आघाडीसह ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना शिरसाट म्हणाले की, या सभेत अजित पवार यांना आज सगळ्यात जास्त त्रास होत असेल. त्यांना सभेत खुर्ची आहे की, नाही माहित नाही. तसेच अजित पवार सभेत नसणार आहे. ते मनातून कुठे असतील याबाबत ४ दिवसांत कळेल आणि सगळ्यांना दिसेल. अजित दादा सगळे विषय हसून खेळून टोलवत आहे. याचाच अर्थ त्यांच्या मनात काहीतरी आहे आणि ते निर्णय शंभर टक्के घेतील.
यापूर्वी सुद्धा त्या मैदानावर बाळासाहेबांनी सभा घेतल्या आहे. त्या सभांसोबत आजच्या सभेची बरोबरी करता येणार नाही. तर तीन पक्ष एकत्र येऊन गर्दी करतायत आणि आम्ही सोबत आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतायत. पण सभेमुळे महाराष्ट्र कुणाच्या मागे आहे ते कळत नाही. सभेमुळे वातावरण बदलते हा समज चुकीचा आहे. शिवसेनाप्रमुख मला म्हणायचे, गर्दी होते मग मतदान का मिळत नाही? त्यामुळे फार लक्ष द्यायची गरज नाही, असं संजय शिरसाट म्हणाले.
मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगरात व्हायला हवी या मताचा मी आहे. यातून मराठवाड्यावरील अन्याय दूर होतो. त्यामुळे ही बैठक व्हायला हवी यासाठी मी प्रयत्न करेल. यावेळी १७ सप्टेंबरला संभाजीनगरमध्ये कॅबिनेट बैठक होईलच, असा दावा देखील संजय शिरसाट यांनी केला आहे.