लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात; शिंदे गटातील नेत्याचं विधान
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आता यावरून शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे.
संजय शिरसाट म्हणाले, मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची ही सहावी भेट आहे. राजकीय चर्चा झाली नाही, अशा बातम्या समोर आल्या. पण माझे मत आहे की, राजकीय चर्चा झाली पाहीजे आणि राज ठाकरे सुद्धा महायुतीत आले पाहीजेत. आगामी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण ताकदीने आम्हाला विजय मिळवायचा आहे.
हेही वाचा – ‘माझा एकच गुन्हा आहे की मी खरं बोलतो’; इंदुरीकर महाराजांचं विधान चर्चेत
राज ठाकरे हे लोकनेते आहेत. त्यांच्या सभांना लाखोंची गर्दी होते. भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राज ठाकरे यांची ताकद एकत्र आली तर लोकसभेत ४५ हून अधिक जागा जिंकणे अवघड नाही. जानेवारी महिन्यात जेव्हा महायुतीची जागावाटपाची चर्चा होईल, तेव्हा या मुद्द्यावरही चर्चा होईल, असा माझा अंदाज आहे, असं संजय शिरसाट म्हणाले.
फेब्रुवारी महिन्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याआधीच या सर्व घडामोडी होऊ शकतात. आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की, राज ठाकरे महायुतीत असावेत. पण हा निर्णय तीनही पक्षांच्या वरिष्ठांच्या हातात आहे. मला वाटतं पक्षश्रेष्ठी हिताचा निर्णय घेतील. पण तो निर्णय महायुतीला बळकटी देणारा असेल, असंही संजय शिरसाट म्हणाले.