मंदिर वही बनायेंगे घोषणेचं काय झालं? राम मंदिराच्या जागेवरून संजय राऊतांचा सवाल
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारी या दिवशी राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु झाली आहे. तसंच यावरुन जोरदार राजकारणही रंगताना दिसतं आहे. राम मंदिर विवादित जागेपासून दूरवर बांधण्यात आले आहे. यावरून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत म्हणाले, बाबरी मशीद जिथे पाडली गेली, तिथे मंदिर होणे अपेक्षित होते. मात्र त्याठिकाणी मंदिर बांधले गेलेले नाही. मंदिर वही बनायेंगे हा नारा भाजपाने दिला होता. ज्या जागेवर मंदिर बनविण्याची घोषणा केली गेली होती, त्याठिकाणी मंदिर बांधले गेलेले नाही. विवादित जागेपासून चार किलोमीटर दूर मंदिर बनविले जात आहे. मग ते कधीही बनविता आले असते. जिथे आम्ही मंदिर बांधण्यासाठी आग्रही होतो, तिथे मंदिर बांधले गेलेले नाही. मग मंदिर वही बनायेंगेचा नारा जनतेला मूर्ख बनविण्यासाठी दिला गेला का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा – अयोध्यानगरी सजली! आजपासून राम मंदिरात विविध कार्यक्रम आणि विधींना सुरुवात
उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेवरून देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. त्यांच्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्यासारखी खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेऊन दाखवावी. दहा वर्षात त्यांनी एकदाही पत्रकार परिषद घेतलेली नाही. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, देवेंद्र फडणवीस यांनी अशी पत्रकार परिषद घेऊन दाखवावी. दिल्लीहून काही कायदेतज्ज्ञ या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार असून राज्य सरकाने घटनेतील दहाव्या परिशिष्टाचे कशा चिंधड्या उडविल्या आहेत, हे सप्रमान दाखवून देण्यात येईल, असं संजय राऊत म्हणाले.
शंकराचार्यांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला विरोध केला आहे. यावरून संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच शंकराचार्य आहेत. चार पिठाच्या शंकराचार्यांपेक्षाही त्यांचे स्थान मोठे आहे. देशात चार पीठांच्या व्यतिरिक्त एक नवे पीठ निर्माण झाले आहे, त्याचे नाव बीजेपी पीठ असून त्याचे शंकराचार्य मोदी स्वतःच आहेत. ते शास्त्र पाहत नाहीत, मूर्ती पाहत नाहीत. निवडणुकीआधी त्यांच्या मनाला वाटले, तेच ते करतील, अशी टीका त्यांनी केली.