‘शिंदे सरकारचा थाटामाटात अंत्यसंस्कार करणार’; संजय राऊतांचं विधान
मुंबई : मराठवाडा मुक्ती संग्रामच्या निमित्ताने संभाजी नगर येथे उद्या मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी संपुर्ण मंत्रिमंडळ उद्या संभाजीनगरला येणार आहे. यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीसाठी इतका थाट कशाकरता? असा सवास संजय राऊत यांना विचारला. यावर ते म्हणाले, या सरकारचं आम्ही अंत्यसंस्कार थाटामाटातच करणार आहोत. हे त्यातच जाणार आहेत. तीन तासांसाठी संपूर्ण प्रशासन वेठीस धरता. हा सगळा खर्च तुम्ही दुष्काळग्रस्तांवर खर्च करा. येथे प्यायला पाणी नाही, अनेक प्रश्न आहेत.
आमचं लक्ष मंत्रिमंडळ बैठकीकडे आहे. बैठकीनंतर होणाऱ्या पोपटपंचीकडे जास्त लक्ष आहे. स्वामी रामानंद तिर्थ, गोविंदभाई श्रॉफ, शंकरराव चव्हाण आदी नेते या संग्रामात होते. त्यांचे या बॅनरवर फोटो नाहीत. मग हे नेते स्वातंत्र्य संग्रामात नव्हते तर काय मोदी, शाह आणि रावसाहेब दानवे संग्रामात होते का? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.
हेही वाचा – नो डीबेट! I.N.D.I.A आघाडीकडून ‘या’ १४ न्यूज अँकर्सवर बहिष्काराचा निर्णय
संभाजी नगरचे सर्व हॉटेल्स बंद आहेत. कोणासाठी, कोण येतंय इथं? किती मंत्री आणि अधिकारी येणार आहेत. जत्रा कोणाची येतेय इथं? जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व हॉटेल्स बुक केल्याचं मला कळलं. कोण करतंय खर्च, बेकायदेशीर सरकारकडून खर्च होतोय. या गोष्टींचा विचार करायला लागेल, असं संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात काही वेगळं चाललं नाहीय. ज्या बेकायदेशीर सरकारचा निकाल चाळीस तास निकाल लागायला पाहिजे होता. पण बेकायदेशीर सरकार राज्यात निर्णय घेतंय. महाराष्ट्राची प्रतिष्ठा पणाला लावतंय, सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात निकाल दिला की हे सरकार बेकायदेशीर आहे. एकनाथ शिंदेंची निवड बेकायदेशीर आहे, गोगावलेंची प्रतोद निवड बेकायदेशीर आहे. त्यामुळे सरकार बेकायदशीर आहे. पण विधानसभेचे अध्यक्ष गेल्या सहा महिन्यांपासून सुनावणी घेण्यास तयार नाही, आणि काल सुनावणी घेतली त्यालाही पुढील तारीख दिली. हे बेकायदेशीर सरकार उद्या मराठवाड्यात येणार आहे. मला असं वाटतं की या सरकारला कोणत्याही प्रकारचे निर्णय घेण्याचा अधिकार नाही. त्यांचे निर्णय बेकायदेशीर ठरणार आहेत. शासन आपल्या दारीचे कार्यक्रम कोट्यवधीचे कंत्राट दिले जात आहेत. हे त्यांचं रॅकेट आहे. सरकारी कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी यांना बोलावलं जातंय. हे कुठेतरी थांबयाल हवं. यासाठी आम्ही कालपासून येथे आहोत, असंही संजय राऊत म्हणाले.