“संघाचं चारित्र्य किती बिघडलेलं आहे हे सरसंघचालकांना माहिती नसेल”; संजय राऊतांची टीका

मुंबई | मुंबईत रविवारी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या एका कार्यक्रमावरून राजकीय वातावरण तापलं आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि सेलिब्रिटी सहभागी झाले होते. मात्र, या उपस्थितींवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, तिथे अनेक निमंत्रित होते. सिने कलाकार, शास्त्रज्ञ, विविध क्षेत्रांतले मान्यवर होते. त्यातल्या काही लोकांना पाहिल्यावर आम्हाला धक्का बसला. भाजपा व संघाच्या राष्ट्रभक्तीबद्दल आम्हाला धक्का बसला. किती ढोंग आणि पाखंड आहे? आम्ही पाहिलं की गायक अदनान सामी हा सरसंघचालकांसोबत बसून ब्रेकफास्ट करतोय. सरसंघचालकांना कदाचित माहिती नसावं किंवा ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांना हे माहिती नसावं की सरसंघचालकांच्या बाजूला बसलेल्या अनेक व्यक्ती देशविरोधी कृत्यांमध्ये सहभागी झालेल्या आहेत.
हेही वाचा : सेमीकंडक्टर डिझाईन क्षेत्रात भारताची ऐतिहासिक झेप ; क्वालकॉमच्या 2 एनएम चिपचे डिझाईन पूर्ण
अदनान सामीचे वडील अर्शद खान हे पाकिस्तानच्या हवाई दलात होते. १९६५ च्या युद्धात अर्शद खान यांनी भारतावर बॉम्बिंग केलं होतं. पठणाकोटचा तळ उद्ध्वस्त केला होता. तो अदनान सामी सरसंघचालकांच्या बगलेत बसला होता. तुम्ही भारताला कोणती प्रेरणा देत आहात? कोणत्या इतिहासाचे धडे देत आहात? बाजूला एक नटी होती. ती म्हणाली ‘आय लव्ह भागवत. मला भागवत फार आवडतात’. तिच्यावर आर्थिक गैरव्यवहाराबाबत लुकआऊट नोटीस आहे. तिचा नवरा लहान मुलांच्या अश्लील चित्रफिती बनवल्याप्रकरणी तुरुंगात होता. ही काय प्रेरणा आहे? असे असंख्य लोक तिथे होते. कदाचित सरसंघचालकांना हे माहिती नसावं की संघाचं चारित्र्य किती बिघडलेलं आहे. भारतावर हल्ला करणारे, लुकाऊट नोटीस असणाऱ्या नट्या, बँका बुडवणारे लोक यांना बोलवून तुम्ही देशाला काय संदेश देत आहात? संघ पापावर पांघरूण घालायचा प्रयत्न करतोय, अशा शब्दांत त्यांनी संघावर आगपाखड केली.
संघामुळे भाजपाला अच्छे दिन आले असतील, पण भाजपामुळे देशाला अच्छे दिन आले नाहीत. याला जबाबदार संघ आहे. भाजपामुळे देशाचे अच्छे दिन निघून गेले. हा देश अमेरिकेचा गुलाम झाला. याची जबाबदारी सरसंघचालकांनी घ्यायला हवी. सरसंघचालक असं म्हणत होते की आमच्या अटी व शर्तींवर असे करार व्हायला हवेत. पण तसे ते झालेले नाहीत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटींवर आम्ही शरणागती पत्करली, असं ते म्हणाले.
जावेद अख्तर यांना संघाच्या कालच्या कार्यक्रमाला बोलावलेलं दिसत नाही. त्यांचे काका अंदमानमध्ये सावरकरांबरोबर काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते हे बहुतेक माहीत नसेल. शाहरुख खानला बोलवलं नाही. त्याचे आजोबा लेफ्टनंट जनरल शाहनवाज असं त्यांचं नाव होतं बहुतेक. ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सैन्याचे सेनापती होते. हे सगळे संघाच्या दृष्टीने राष्ट्रद्रोही आहेत. पण अदनान सामी, लुकआऊट नोटीस असणाऱ्या नट-नट्या हे संघ परिवाराच्या दृष्टीने नवीन राष्ट्रभक्त आहेत, अशी टीका त्यांनी केली.




