‘महाराष्ट्रात ठाकरे-२ सरकार येणार’; संजय राऊतांचा मोठा दावा
![Sanjay Raut said that Thackeray-2 government will come in Maharashtra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Sanjay-Raut-2-780x470.jpg)
मुंबई | लोकसभा निवडणुकीत झालेल्या जोरदार राजकीय संघर्षानंतर संपूर्ण राज्याला आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांचे दौरे वाढले आहेत. तसेच, महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असणार? महायुती आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार? याबाबतही चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच ठाकरे गटाने खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, विधानसभेची निवडणूक घेण्याची त्यांची इच्छा नसली तरी त्यांना घ्यावी लागेल. निवडणूक आयोगाला उत्तर द्यावं लागेल. नोव्हेंबरमध्ये त्यांना विधानसभा अस्तित्वात आणावी लागेल. हरियाणा, झारखंड, जम्मू-काश्मीर आणि महाराष्ट्रातील निवडणुका त्यांना वेळेतच घ्याव्या लागतील. जसं घटनाबाह्य सरकार चालवलं जात आहे तसं निवडणुकींच्या तारखा मॅनेज करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करतील. मात्र, महाराष्ट्रातील जनता आणि विरोधी पक्ष जागृत आहे आणि आमचंही लक्ष आहे. विधानसभेची निवडणूक वेळेवर व्हायलाच पाहिजे, कारण आम्हाला खोकेवाल्यांचं सरकार घालवायचं आहे.
हेही वाचा – सुप्रसिद्ध “डम डम डम डम डमरू वाजे’ गाण्याचं ‘नवरा माझा नवसाचा 2’ मध्ये रिक्रिएशन
महायुतीला लोकसभेचा सर्व्हेही अनुकूल नव्हता आणि विधानसभेचाही नाही. आम्हाला कोणत्याही सर्व्हेची गरज नाही. कोणत्याही परिस्थितीत राज्यात ठाकरे-२ सरकार येणार, म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार येणार हे कोणीही थांबवू शकत नाही. मग त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर कितीही घोषणा करूद्या. मग कितीही योजना आणा, पैशांचा धुरळा उडवा, मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करा. पण निवडणुका तुम्हाला वेळेतच घ्याव्या लागतील, असं संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्रातील सर्व गद्दार आमदार पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत. राज्यातील लाडक्या बहिणी त्यांचा पराभव करतील. आमदारांना ५० कोटी, खासदारांना १०० कोटी तर नगरसेवकांची किंमत ५ कोटी आणि आमच्या लाडक्या बहिणींसाठी १५०० रूपये देता का? तेही मते दिली नाहीत तर पैसे परत घेण्याची भाषा करतात, असंही संजय राऊत म्हणाले.