‘२०१४ला देशाला लागलेली पनवती २०२४ला दूर होणार’; ठाकरे गटाचा टोला
![Sanjay Raut said that Panvati, which hit the country in 2014, will be removed by 2024](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Uddhav-Thackeray-and-Narendra-Modi-780x470.jpg)
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थान, मध्यप्रेदशमध्ये जाऊन प्रचार करत आहेत. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं आहे. उद्या एकनाथ शिंदे जो बायडेन यांच्या प्रचारालाही जाऊ शकतात, कारण ते महान नेते आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. एवढंच नाही तर देशाला २०१४ ला देशाला लागलेली पनवती २०२४ ला दूर होणार, असा टोलाही लगावला आहे.
संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे हे हिंदूहृदय सम्राट असतील पण त्यांनी असं काय महान कार्य केलं आहे ते आम्हाला पाहावं लागेल. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलं आहे. आम्ही त्यांचा संघर्ष पाहिला. बाळासाहेबांनी कधीही सत्तेसाठी तडजोडी केल्या नाहीत, बेईमानी केली नाही. आता बेईमान आणि गद्दारांना हिंदूहृदय सम्राट म्हणण्याची परंपरा नव्या हिंदुत्वात सुरू झाली असेल तर पहावं लागेल.
हेही वाचा – ‘..तर भर चौकात जोड्याने मारतो’; एकनाथ खडसेंचं गिरीश महाजनांना प्रत्युत्तर
राजस्थान भाजपाला महाराष्ट्रात काय चाललंय हे कुठे ठाऊक आहे? एकनाथ शिंदे तिथे खोके घेऊन प्रचाराला गेले असतील. महाराष्ट्रात अशा पदव्या लावण्याची हिंमत नाही कारण लोक जोड्याने मारतील. महाराष्ट्रात ज्यांना पनवती समजलं जातं ते बाहेर जाऊन हिंदुत्वाचा प्रचार करतात. हहिंदूहृदयसम्राट या देशआत दोनच आहेत, एक स्वातंत्र्यवीर सावरकर आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे त्यानंतर कुणीही ही पदवी घेऊ शकत नाही. कारण त्यांचा संघर्ष आणि काम खूप मोठं होतं, असं संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्राची पनवती असलेले एकनाथ शिंदे बाहेर प्रचाराला जात आहेत. ते महाराष्ट्रातही हरणार आणि बाहेरही. २०१४ पासून देशाला पनवती लागली आहे. खासकरुन जे स्वतःला हिंदुत्व समजत आहेत त्यांना पनवती शब्दाबाबत अडचण वाटायला नको. जरा या शब्दाचा अर्थ समजून घ्या. भाजपाला या शब्दाचा राग यायला नको. २०१४ ला लागलेली पनवती २०२४ ला दूर होणार आहे, असंही संजय राऊत म्हणाले.