‘नेहरूंचं आजही स्मरण, मात्र मोदींचं स्मरण राहणार नाही’; संजय राऊतांची टीका
![Sanjay Raut said that Nehru will be remembered even today, but Modi will not be remembered](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Sanjay-Raut-2-780x470.jpg)
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत भाषण करताना देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. नेहरू आरक्षणाच्या विरोधात होते, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केलं.
खासदार संजय राऊत म्हणाले की, या लोकांना इतिहासाचं भान नाही. काल मी भाजपाच्या एका नेत्याचं भाषण ऐकलं. ते म्हणाले की काँग्रेसनं वारंवार कसा बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला. शेवटी त्या वक्त्यानं सांगितलं की भंडारा मतदारसंघात काँग्रेसनं आंबेडकरांचा पराभव केला. गंमत अशी आहे, की तेव्हा बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसचे उमेदवार नव्हते. पण त्यांचा पराभव करण्याची जबाबदारी तेव्हा ज्यांच्यावर होती, ते तिकडचे काँग्रेसचे नेते मनोहर पटेल यांचे चिरंजीव प्रफुल्ल पटेल हे आज भाजपामध्ये आहेत, असं राऊत म्हणाले.
मनोहर पटेल तेव्हा भंडाऱ्याच्या निवडणुकीचे प्रमुख होते. तेव्हा काँग्रेसच्या विजयाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्या प्रफुल्ल पटेलांना तुम्ही वाजत-गाजत पक्षात घेतलंय. त्यामुळे हा ढोंगीपणा भाजपाच्या धमन्यांतून कधी बाहेर पडेल सांगता येत नाही. खोटारडेपणावरच हा पक्ष टिकून आहे. पंडित नेहरूंच्या संदर्भात त्यांनी केलेली वक्तव्य हे नेहरूंचं यश आहे असं मी मानतो. नेहरूंचं निधन होऊन ६० वर्षं झाली. पण गेल्या १० वर्षांत मोदी त्यांच्या नावाचा जप करतायत. जेव्हा मोदी पदावरून दूर होतील, तेव्हा त्यांचं स्मरण कुणाला राहणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा – Propose Day | प्रेम व्यक्त करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात; तुम्हाला कधीच मिळणार नाही नाकार!
आजही भाजपाला काँग्रेसची भीती वाटते. इंडिया आघाडीची भीती आहे. तुम्हाला तुमच्या हिंमतीवर, ताकदीवर ४०० जागा मिळणार आहेत असं तुम्ही म्हणताय ना. मग गेल्या १० वर्षांत तुम्ही वारंवार काँग्रेसवर टीका का करताय? ५०-६० वर्षांचा इतिहास तोडून-मोडून लोकांसमोर का सांगताय? तुम्ही केलेल्या कामांविषयी बोला. पंतप्रधानांच्या भाषणात कुठेही मणिपूरचा उल्लेख आला नाही. तुम्ही काँग्रेसमुळे राष्ट्र कसं दुभंगलंय असं म्हणता. पण मणिपूर दुभंगलंय. तुमच्या मनात मणिपूरबद्दल थोडीही वेदना नसावी? असं संजय राऊत म्हणाले.
तुम्ही कश्मिरी पंडितांविषयी एक शब्द बोलला नाहीत. ज्या कश्मिरी पंडितांच्या नावावर २०१४ला तुम्ही मतं मागितली. त्यांच्या घरवापसीवर आधी तुम्ही बोलत होतात. पण आता त्यांच्यावर तुम्ही बोलला नाहीत. लडाखमध्ये चीन घुसलाय त्यावर तुम्ही बोलला नाहीत. पण फक्त पंडित नेहरू आणि काँग्रेसचं भजन करत बसलात. आता हे रामालाही विसरले आणि पुन्हा काँग्रेसच्या मागे लागलेत, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.